भिवंडी – भिवंडी तालुक्यातील माणकोली-अंजूर रोडवर भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोन भावांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे भारोडी गावावर शोककळा पसरली आहे. हे दोघे भारोडी गावातील राहणारे आहे.
विश्वास भोईर (वय 40) आणि नीलकंठ भोईर (32) अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की तरुणांच्या शरीराची अवस्था छिन्न-विछन्न झाली. त्यामुळे त्यांनी जागीच प्राण सोडले.
अपघातात मृत्यूमुखी पडलेले दोनही तरूण आधी रेतीचा व्यवसाय करत होते. मात्र, लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद झाल्याने ते गोदामातील वाहनात माल भरणे आणि खाली करण्याचे काम करत होते. अशातच एका ट्रकमधील माल खाली करण्यासाठी त्यांना फोन आल्याने ते दुचाकीवरून निघाले होते.
यावेळी वीटा घेवून जाणाऱ्या ट्रकने या दोघा भावांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यावेळी दोघेही ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने चिरडले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला.