पुणे – मार्केट यार्डात व्यवहाराच्या वेळी सोशल डिस्टन्स पाळला जात नाही. त्यामुळे मार्केट यार्डातील बाजाराचे शहरातील विविध भागात विकेंद्रीकरण करण्याची मागणी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख आणि विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना देण्यात आले आहे.
करोनाच्या भीतीने कामगारांनी बंद पुकारला होता. मात्र, बाजार समितीने केलेल्या आवाहनानुसार कामगार कामावर येत आहेत. मार्केट यार्ड परिसरात नुकतेच करोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एक भाजी विकणारा पथारीवाला आहे. त्यामुळे बाजार आवारातील लोक चिंतेत आहेत. बाजारात माल खरेदी करताना अथवा गाडीतून खाली करताना सोशल डिस्टन्स पाळला जात नाही. त्यामुळे हा बाजार विरळ करावा. ठिकठिकाणी बॅरिकेट व बांबू लावावेत. पट्टे मारावेत अशा व्यवस्था केल्यास करोना संसर्ग धोक्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असून, बाजार घटकांमधील भीतीचे प्रमाण कमी होईल ,असे या पत्रात म्हटले असल्याचे संतोष नांगरे यांनी यावेळी सांगितले.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर विमा काढण्याची मागणी कामगारांनी यापूर्वीच केली आहे. बाजाराचे विकेंद्रीकरण केल्या सोशल डिस्टन्स पाळला जाईल. तुलनेने गर्दी कमी होईल. सर्व भागात राहणाऱ्या नागरिकांचा या निर्णयामुळे फायदा होईल, असेही नांगरे यांनी म्हटले आहे