पुणे (अक्षय आखाडे) – हाताशी चार पैसे अधिक यावेत म्हणून शेतकऱ्यांनी चाळीत साठवून ठेवलेला कांदा यंदा दोन महिन्यातच सडायला लागला आहे. त्यामुळे बळीराजाला हाती पैसे देणाऱ्या या पिकाच्या उत्पन्नावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे.
उन्हाळी कांदा शेतकरी दरवर्षी चाळीत साठवून ठेवतात. मात्र, भेसळयुक्त आणि टीकवण क्षमता नसलेले बियाणे, अवेळी झालेली अतिवृष्टी यामुळे नेहमीच्या तुलनेत चाळीतील कांदा यंदा लवकरच खराब होत आहे.
गतवर्षी राज्यात सर्वत्र कांदा बियाण्याचा तुटवडा होता. शेतकऱ्यांनी उधार उसनवारी करून महागडे बियाणे खरेदी करून उन्हाळी कांद्याची पेरणी केली. मात्र, बियाणे भेसळयुक्त निघाल्याने उत्पादित कांदा चाळीत दोन ते अडीच महिन्यांत खराब होत असल्याने शेतकऱ्यांना वेळेआधीच तो विकायला काढावा लागत आहे.
पुणे मार्केट यार्डात मुख्यत: श्रीगोंदा आणि करमाळा तालुक्यातील कांदा विक्रीस येतो. मात्र, दोन्ही तालुक्यातून पुणे बाजारात येणाऱ्या कांद्यापैकी निम्मा माल डागी आहे. या आठवड्यात बाजारात खराब कांद्यामुळे आवक वाढली. परिणामी गेल्या आठवड्यात दोन हजाराच्या आसपास असलेला बाजारभाव या आठवड्यात मात्र दीड हजारांवर आला आहे.
खराब कांद्याला उठाव नसल्याने कमी दरात कांदे खरेदी करावी लागत असल्याचे बाजारपेठेतील व्यापारी सांगत आहेत. चार नंतरच्या संचारबंदीमुळे फेरीवाल्यांच्या विक्रीची वेळ कमी झाल्याने ग्राहक देखील कमी झाल्याचे फेरीवाले सांगत आहेत.
खरिपाच्या भांडवलाची चिंता
बंद बाजारपेठ, लॉक डाऊनचा फटका , बियाण्याचा तुटवडा, करपा रोग, कवडीमोल भाव सोसत शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन घेतले.अयोग्य हवामानामुळे कांदा आकाराने बारीक राहिला. भेसळयुक्त बियाण्यामुळे कांदा सडण्याचे प्रमाण वाढत आहे. सप्टेंबरमध्ये फोडण्यात येणाऱ्या कांदा वखारी यावर्षी दोन महिने आधीच फोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. मिळेल त्या भावात कांदा विक्री करावी लागत आहे. त्यामुळे खरीप पिके उभे करण्यासाठी खते व औषधांसाठी भांडवलाची चिंता भेडसावत आहे.कोटगेल्या आठवड्याच तुलनेत अवाक वाढली असून बाजारात परराज्यातील व्यापाऱ्यांचा उठाव जास्त नसल्याने स्थानिक बाजारात कांदा विक्री होत आहे. कांदा बाजारभाव दीड हजारांच्या आसपास स्थिर आहेत. चांगल्या मालाला चांगली किंमत मिळत आहे. – नितीन पोळ आडते, पुणे
उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवलेला होता. मात्र दरवर्षी इतकी यंदाच्या कांद्याची टिकवण क्षमता नसल्याने कांदा लवकरच नासायला सुरुवात झाल्यामुळे कांदा कमी भाव असताना देखील विक्री करावीे लागत आहे. या किमतीत कांदा विकायचा म्हटले तर आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.यामुळे खरिपाचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. – धनंजय गोसावी कांदा शेतकरी.