रांची – चीनसह जगभरात पसरत असलेल्या करोना विषाणूच्या संसर्गामुळे भारतात होणारी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) पुढे ढकलण्यात आली आहे. करोनावर सध्यातरी नियंत्रण आणण्यात यश आलेले नाही, त्यामुळे जर यंदाची स्पर्धाच रद्द झाली तर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसमोर भारतीय संघात पुनरागमन करण्याचेच आव्हान निर्माण होणार आहे.
मुळ वेळापत्रकानुसार ही स्पर्धा येत्या 29 मार्चपासून सुरु होणार होती, मात्र ती 15 एप्रिलपासून घेण्यात येणार आहे. अर्थात त्यावेळीही करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती बदल झाला नाही व स्पर्धाच रद्द करावी लागली तर धोनीचे भवितव्य काय राहील असा प्रश्न निर्माण झाला आहे. धोनीला संघात पुनरागमन करायचे असेल तर त्याने आयपीएलमध्ये सरस कामगिरी करावी असे संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री तसेच निवड समितीने स्पष्ट केले होते. त्यामुळे आता ही स्पर्धाच रद्द झाली तर धोनीला संघात परतण्यासाठी थेट संघात स्थान देत अन्य मालिकेत खेळविणार की त्याला संघाबाहेरच राहावे लागणार याबाबत अद्याप भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तसेच निवड समिती आणि शास्त्री यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
यंदा ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होत असून त्यात धोनी खेळणार का असा प्रश्न विचारला जात आहे. धोनीने विश्रांती घेतल्यापासून निवड समितीने अनेक यष्टीरक्षक फलंदाजांना संघात संधी दिली होती, मात्र त्यातील एकालाही धोनीप्रमाणेच काय तर किमान त्याच्या जवळपास जाणारीही कामगिरी करता आलेली नाही, त्यामुळे एकतर धोनीला संघात थेट प्रवेश देण्यात येणार का आधी अन्य मालिकेत खेळविण्यात येणार व त्यातील कामगिरीनुसार निर्णय घेतला जाणार हा तिढा निर्माण झाला आहे. माजी कसोटीपटू व समालोचक अकाश चोप्रा याने मात्र धोनीची बाजू घेत तो थेट संघात स्थान मिळवू शकतो असे मत व्यक्त केले आहे. धोनी सारख्या अनुभवी खेळाडूला जास्त काळ बाहेर ठेवणे शक्य नाही, असेही त्याने सांगितले.