मुंबई – जेव्हा लोक पाण्यावाचून तडफडत मरत होते त्यावेळी यांच्या एसी शामियान्यात मेजवान्या सुरु होत्या. जे 14 लोक मेले त्यांच्या मृत्यूविषयी वाईट वाटू द्या. तुमची संवेदना मेली आहे. मेलेल्यांच्या मढ्यावरचे लोणी खाणारे हे सरकार आहे, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
खारघरमध्ये पाण्याशिवाय श्रीसेवकांना तडफडून मारले असे म्हणत राऊत यांनी 50 श्रीसेवकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून राऊत यांच्या या वक्तव्याविरोधात शिवसेनेने मरिन लाईन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
राऊत यांनी शुक्रवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर सडकून टिका केली. राऊत म्हणाले, खारघर दुर्घटने प्रकरणी सरकारने समिती नेमलेली आहे. ती कसे काम करेल याबाबत वेगळे सांगायला नको. आधी खारघर दुर्घटना कशी घडली ते सांगा. हा सदोष मनुष्यवध आहे. तुमची मस्ती शमविण्यासाठी लोकांचा जीव घेतला.
मोठ्या नेत्याला लोक भेटताततच
राऊत यांनी शरद पवार-गौतम अदानी भेटीवर भाष्य केले. राऊत म्हणाले, राजकारणातले 2 व्यक्ती एकत्र आल्यावर राजकीय चर्चा होतेच. येत्या काळात याविषयी सविस्तर माहिती कळेलच. अदानी-पवार भेटीशी माझा संबंध नाही. एका मोठ्या नेत्याला वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक भेटत असतातच.
मराठा समाजाच्या निर्णयात कमी पडले
सध्याचे उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते असताना आम्हाला सत्तेत येऊ द्या 2 दिवसात मराठा आरक्षण देतो, असे म्हणत होते. आम्ही वाट पाहतोय. धनगर, मराठा समाज वाट पाहत आहेत. आता 9 महिन्यापासून तुमच्याकडे सत्ता आहे. धनुष्यबाण काढून घेताना तत्परतेने निर्णय घेतला मात्र मराठा समाजाच्या निर्णयात कुठे कमी पडले? असा सवालही मराठा आरक्षण प्रश्नावरून राऊतांनी सरकारला विचारला आहे.