मुंबई – राज्यात नुकत्याच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये अनेक बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. या विजयाचा जल्लोष महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. तर अशातच आता आमदार संतोष बांगर यांचे प्रचारादरम्यानचे भाषण निकालानंतर त्यांच्या अंगलट येताना दिसत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या प्रचारामध्ये आमदार बांगर यांनी 17 पैकी 17 जागा निवडून नाही आल्या तर मिशी काढेन असे वक्तव्य केले होते. परंतू त्यांच्या विरोधात एकवटलेल्या मविआच्या पॅनलने 17 पैकी 12 जागांवर विजय संपादीत केला. त्यामुळे आता त्यांच्या या वक्तव्याचा समाचार खासदार संजय राऊत यांच्याकडून घेण्यात आला आहे. मिशा काढल्या नसतील तर आम्ही न्हावी पाठवतो, अशी टीका राऊत यांच्याकडून त्यांच्यावर करण्यात आली आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना राऊत पुढे म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल हे सरकार आणि भाजपच्या विरोधातील आहेत. काही विशिष्ट भाग वगळला तर सर्वत्र शिवसेनेसह महाविकास आघाडी यांना मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. ज्या मतदार संघात शेतकरी, कष्टकरी मतदान करतो. त्याठिकाणी शिवसेना आजपर्यंत लढली नव्हती.
अशा ठिकाणी शिवसेनेचे पॅनेल निवडून आले आहेत. काही गद्दार आमदारांनी घोषणा केल्या होत्या, आम्ही हारलो तर मिशा काढू. आता मिशा काढल्या आहेत का बघा नाही तर हजामत करायला इथून न्हावी पाठवतो, असा निशाणा राऊत यांनी संतोष बांगर यांच्यावर साधला.
काय बोलले होते बांगर?
कळमनुरी बाजार समितीच्या निवडणुकीत संतोष बांगर यांचे पॅनल देखील होते. त्यांच्या पॅनलच्या प्रचारावेळी बांगर यांनी 17 पैकी 17 जागा निवडून आल्या नाहीत तर मिशी काढेन, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या संख्येने व्हायरल होत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता जोरदार टीका करण्यात येत आहे. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी अयोध्या पोळ यांनी देखील बांगर यांना त्यांच्या या वक्तव्याची आठवण करून देत त्यांना वस्तरा भेट म्हणून पाठवल्याची माहिती समोर आली आहे.