मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाय.बी.सेंटर येथे “लोक माझे सांगाती’ या त्यांच्या आत्मचरित्राच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचे जाहीर केले आणि सभागृहात एकच गोंधळ उडाला. शरद पवार यांच्या या निर्णयाला कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला. सभागृहात उपस्थित असणाऱ्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांना तर अक्षरशः अश्रु अनावर झाले.
वाय.बी.सेंटर बाहेर व राज्यभर राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी भावूक होत निर्णय मागे घेण्याची मागणी केली. कार्यकर्त्यांच्या भावना इतक्या तिव्र होत्या की, “शरद पवार येत्या दोन-तीन दिवसांत फेरविचार करून निर्णय जाहीर करतील,’ असे अजित पवारांना जाहिर करावे लागले.
“कुठे थांबायच हे मला कळते. या निर्णयामुळे काही जणांना अस्वस्थ वाटेल. मात्र, गेली सहा दशके राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर काम केल्यानंतर मी आता निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे,असे शरद पवार यांनी म्हटले. पवार पुढे म्हणाले, आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने एक समिती नेमावी.
या समितीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवर, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजळ, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, फौजिया खान, नरहरी झिरवळ आदी असतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसची जबाबदारी कोणाकडे सोपवायची, याचा निर्णय या समितीने घ्यावा. सर्व कार्यकर्ते, नेत्यांना अधिकाधिक वेळ देणार, सर्वांना सोबत घेऊ जाणारा, असा अध्यक्ष निवडावा. राष्ट्रवादीचा अध्यक्ष निवडताना, या सर्वांचा विचार करावा.
मात्र ही सार्वजनिक निवृत्ती नाही, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले. गेली सहा दशके मी जनसामान्यांसाठी जे काम करत गेलो आहे, त्या सेवेत आताही खंड पडू देणार नाही. विकास, शेती अशा काही क्षेत्रासाठी मी आता अधिक वेळ देईल, असेही पवार म्हणाले.
भावूक झालेले जयंत पाटील यावेळी म्हणाले, शरद पवारांकडे बघून आम्ही राजकारण केले. त्यांनी अलीकडच्या काळात भाकरी फिरवण्याची भाषा केली. पवार साहेब मी तुम्हाला सगळा अधिकार देतो. तुम्ही आमच्या सगळ्यांचे राजीनामे घ्या. पवार कोणा नवीन लोकांच्या ताब्यात द्यायचाय तो द्या. मात्र, तुम्ही पक्ष सोडून बाजूला जाणे कोणाच्याही हिताचे नाही. तुम्ही बाजूला जाऊन आम्ही कुणीच काम करू शकणार नाही.
राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचे राजीनामे
दरम्यान शरद पवार यांच्या निर्णयानंतर राज्यभरातून राज्यकर्त्यांनी विरोध दर्शवत राजीनामे देण्यास सुरवात केली आहे. जळगाव येथील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील व धाराशीव जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी पदाचा राजीनामा दिला असून निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. दोघांनीही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे.
तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदावरून पायउतार होण्याची घोषणा करताच बुलढाण्यात सिंदखेडराजा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. बुलडाणा जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष नाझेर काजी यांनी देखील जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची निदर्शने करण्यात येत आहेत.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची केलेली घोषणा पक्षातील अनेक कार्यकर्त्यांना पटलेली नाही. त्यामुळे अजूनही मुंबईतील वायबी सेंटरच्या बाहेर अनेक कार्यकर्त्यांनी त ठिय्या मांडल्या असून, त्यांच्याकडून आंदोलन केले जात आहे. शरद पवार यांनी आपला निर्णय नागे घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण कार्यकर्ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.
शरद पवारांनी घेतलेला निर्णय त्यांच्या पक्षाचा अंर्तगत विषय आहे. पण पवारांसारख्या एका अनुभवी नेत्याने असा निर्णय घेण निश्चितच खटकणारी बाब आहे. विशेष म्हणजे केंद्रीय पातळीवर सर्व विरोधीपक्ष एकत्र येऊन भाजपच्या विरोधात फळी उभी करत असताना शरद पवार यांची निवृत्ती न पटणारी बाब आहे.
-पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री
राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचे शरद पवार यांचा निर्णय वैयक्तिक आहे. मात्र राजकारणातील पवारांचे मानाचे स्थान कायम राहिल, व त्यांच्या निर्णयाचा महाविकास आघाडीवर काहीही परिणाम होणार नाही.
– अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री
एक वेळ अशी आली की घाणेरडे आरोप, प्रत्यारोप करण्यात आले. राजकाराणाचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील पदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तेच केले आहे. जनतेच्या रेट्यामुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला. शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत. भाकरी फिरवण्याचे संकेत होते. पण त्यांना आता तवाच फिरवला आहे.
– संजय राऊत, खासदार, शिवसेना(ठाकरे गट)
शरद पवारांनी कोणत्या कारणाने निवृत्तीची घोषणा केली हे सांगणे शक्य नाही. अजित पवारांबाबत माध्यमांत जे काही येत होते ते की, त्यांच्या परिवारात काय असेल किंवा शरद पवारांची प्रकृतीचा विषय असो, असे अनेक अंदाज बांधले जाऊ शकतात. पवार शेवटच्या श्वासापर्यंत सामाजिक आणि राजकीय जीवनात राहतील असे आम्हाला वाटते. पण, त्यांनी का निवृत्तीची घोषणा केली? हे समजण्यापलीकडे आहे. तरीही त्यांच्या घोषणेमुळे महाविकास आघाडीला काहीही फरक पडणार नाही. राष्ट्रवादीत जेही अध्यक्ष होतील त्यांच्यासोबतही आमचे चांगले संबंध राहतील.
– नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय कॉंग्रेस
शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अक्ष्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्याला पक्षातून तीव्र विरोध होत आहे. मात्र, शरद पवार यांच्या राजीनाम्यावर आत्ताच बोलणार नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री