मुंबई – महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार? याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मात्र विश्वसनीय सुत्रांच्या माहितीनुसार येत्या 24 तासात मंत्र्यांना खातेवाटप होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांचा 2 जुलैला शपथविधी पार पडला. नव्या मंत्र्यांनी शपथ घेऊन 12 दिवस उलटले तरीही नव्या मंत्र्यांचं खातेवाटप झालेलं नाही. तसेच येत्या 17 जुलै पासून विधी मंडळाचे तीन आठवड्यांचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. अशा परिस्थितीत नव्या मंत्र्यांसाठी खातेवाटप होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत होता मात्र आता खातेवाटपाचा तिढा सूटल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, गेल्या चार ते पाच दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाबाबत विविध स्तरावर बैठका झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सलग तीन दिवस रात्री उशिरा बैठका पार पडल्या. खातेवाटपाबाबत चर्चेसाठी अजित पवार हे काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते. यावेळी अजित पवार आणि अमित शाह यांच्यात एक तास बैठक पार पडली. त्यानंतर रात्री उशिरा राज्यात खातेवाटप आणि मंत्रिमडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाचा विस्तार हा पावसाळी अधिवेशनानंतरच होण्याची शक्यता आहे. तर पावसाळी अधिवेशनाआधीच नव्या मंत्र्यांना खातेवाटप केलं जाणार आहे. पुढच्या 24 तासात खातेवाटप होणार असल्याची माहिती आहे. तसेच अशीही माहिती समोर आलीय की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या मंत्र्यांना शिंदे गटाकडील कोणतंही खातं दिलं जाणार नसून फक्त भाजपच्या मंत्र्यांकडे असणारी खाती दिली जातील. अर्थ,सहकार,महसूल,ग्रामविकास,सार्वजनिक बांधकाम,अन्न व औषध प्रशासन,कामगार,सामाजिक न्याय,अल्पसंख्यांक,महिला व बालकल्याण ‘ही’ खाती राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.