मुंबई – राज्यात शिवसेनेच्या शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी (मविआ) विरूद्ध भाजप अशीच लढत पहावयास मिळेल, असे भाकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी केले.
पुढील विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढवेल, असे सूतोवाच नुकतेच त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. त्यामुळे बावनकुळे यांचे वक्तव्य खरे मानल्यास शिंदे गटाच्या वाट्याला केवळ 48 जागा उरतात. त्या पार्श्वभूमीवर, येथे पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी शिंदे गटाचे अस्तित्व उरण्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
भाजपला स्थानिक, प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व मान्य नाही. ते पक्ष आपली मतं खातील असे भाजपला वाटते. त्यामुळे मित्र असो की शत्रू; लहान पक्षांना नामोहरम करणे हाच भाजपचा एककलमी कार्यक्रम असतो. पुढील निवडणुकीत विधानसभेच्या सर्व जागा स्वत:च्या चिन्हावर लढवण्याची भाजपची रणनीती असेल, असा दावाही त्यांनी केला.