मुंबई – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्यानंतर भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पटली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाला फक्त 48 जागा देण्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. त्यावर शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देत चंद्रशेखर बावनकुळे यांना खडेबोल सुनावले आहे.
शिरसाट म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्टेटमेंटमध्ये दम नाही. त्यांना एवढे अधिकार कोणी दिले, हे माहिती नाही? अशा वक्तव्यामुळे युतीमध्ये वाद निर्माण होतो, याची जाणीव बावनकुळे यांना असायला पाहिजे. आम्ही काय मुर्ख आहोत का फक्त 48 जागा लढवायला? दोन्ही पक्षातील जागावाटपासाठी वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिली.
दुसरीकडे आमदार संजय गायकवाड म्हणाले, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हा शिंदे गट नाही तर ही शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना. भाजप-शिवसेनेची ही युती बाळासाहेबांनी केलेली आहे. त्यामुळे इतर कुठला नेता काही घोषणा करत असेल तर त्यांच्या शब्दाला काही अर्थ नाही. आमची युती पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. युतीचा विषय या नेत्यांसोबत आहे. यामुळे बावनकुळे यांना आम्ही महत्त्व देत नाही, अशा शब्दांत हल्लाबोल केला.
जे पोटात, तेच ओठात
आता तर कुठं सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांचे चागले व्हावे, अशीच आमची सदिच्छा आहे. पण भाजप त्यांचे काय करेल हे आता सांगता येणार नाही. जे बावनकुळेंच्या पोटात होते, तेच त्यांच्या ओठातून निघाले आहे, असा टोला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगाविला. तसेच भाजप हा एक नंबरचा खोटारडा पक्ष आहे. भाजपकडून सातत्याने जनतेची दिशाभूल करण्यात येते. आता भाजपाबद्दल लोकांमध्ये तीव्र असंतोष असल्याचेही ते म्हणाले.