मुंबई – इंडियन प्रीमिअर लीगबाबतची (आयपीएल) महत्त्वपूर्ण बैठक रद्द करण्यात आल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी स्पष्ट केले. आता ही बैठक कधी होणार ते लवकरच सांगण्यात येणार असले तरी आयपीएलच्या संघ मालकांनी प्रसंगी आर्थिक नुकसान झाले तरी ते सोसण्याची तयारी दर्शविली आहे, असेही समोर येत आहे.
करोना विषाणूंचा धोका वाढत आहे. याचमुळे मूळ वेळापत्रकाने येत्या 29 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार होती, मात्र ती 15 एप्रिलपासून सुरू करण्याचे निश्चित झाले होते. मात्र, त्या वेळापर्यंतही करोनाचा धोका संपुष्टात योईल याची खात्री नसल्याने ही स्पर्धा पुढे जुलैपर्यंत पुढे ढकलली जाण्याचीच शक्यता जास्त दिसत होती. मात्र आता स्पर्धेतील विविध संघांच्या संघ मालकांनीच स्पर्धा रद्द करण्याच्या निर्णयाला समर्थन देण्याची तसेच होणारे आर्थिक नुकसानही सोसण्याची तयारी दर्शविली आहे.मंडळाचे अधिकारी व संघमालक टेलिकॉन्फरन्सिंगवर चर्चा करणार होते, मात्र करोनामुळे ही बैठकही रद्द करण्यात आली.
आयपीएल रद्द झाल्यास जवळपास 4 हजार कोटींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यातच प्रत्येक संघाच्या मालकांना दीडशे कोटींचा फटकादेखील बसणार आहे. मंडळानेच जरी ही स्पर्धा रद्द केली तरी एकाही संघाला त्याची नुकसानभरपाई मिळणार नसल्याचे वृत्तही पुढे आले आहे. ही स्पर्धा किती पुढे ढकलण्यात यावी हे स्पष्ट होत नाही, तसेच करोनाचा धोका सगळीकडे होत असताना ही स्पर्धा परदेशातही आयोजित करू शकत नाही. त्यामुळे सध्या तरी स्पर्धेबाबत कोणतेही चित्र स्पष्ट झालेले नाही, त्यामुळे आता ही स्पर्धा रद्द करण्यावाचून खरेतर कोणताही पर्याय समोर दिसत नाही, असे एका संघमालकाने सांगितले आहे.