संचारबंदीची एैशीतैशी : दखल घेण्याची गरज
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत मागील सहादिवसांपासून एकही करोना रुग्ण सापडला नसल्याने नागरिकांमध्ये गांभीर्य राहिले नाही. घरात बसण्यास सांगितले असूनही महापालिका हद्दीतील बरेच नागरिक रस्त्यांवर येत आहेत. त्यामुळे सोसायट्यांमधील लहान मुलांपासून मोठ्या तरुणांपर्यंत सर्वजण घोळखा करून बसत आहेत. काही ठिकाणी क्रिकेट, गोट्या, चेंडू फेकून मारणे असे खेळ खेळले जात आहेत. पोलीस राउंडला आले की सर्व घरांनी पळतात. त्यामुळे सोसायटीतील जाणकार नागरिक चिंता व्यक्त करत आहेत.
केंद्रशासन आणि महाराष्ट्र शासन आतोनात प्रयत्न करत असताना समाजात त्याविषयी गांभीर्य नसल्याने आटोक्यात आलेली परिस्थिती पुन्हा उग्र रूप धारण करू शकते. तेव्हा पोलीस प्रशासनाने अशांवर कडक कारवाई करणे अपेक्षित आहे. सोसाट्यांमधील काही जाणकारांनी त्यांना घरी जाण्यास सांगितले तर तरुणांकडून उद्धट उत्तरे दिली जात आहेत. तसेच तरुण एकत्र येऊन दंगामस्ती, गोंगाट करून घरी बसलेल्या नागरिकांना त्रास देत आहेत. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांना डोकेदुखी होत आहे.
सोसायटीतील रहिवाशांनी आपल्या पाल्ल्यांना या सर्व गोष्टींविषयी व्यवस्थित समजून सांगणे अपेक्षित आहे. त्यांना घरातील बैठे खेळ खेळण्यास प्रवृत्त करणे, त्याला बाहेर जाण्यास मज्जाव करणे अपेक्षित असताना काही रहिवासी आपल्या पाल्ल्यांना काही बोलत नाहीत. त्यामुळे एक एक करत बरेच जण एकत्र येत असल्याने दोन नागरिकांमधील अंतर एक मीटरपेक्षा अधिक असणे अपेक्षित आहे. परंतु या सर्व नियमांना सर्रासपणे हारताळ फासला जात आहेत. नागरिकांमधील साखळी तोडण्यासाठी केंद्रशासनाने संपूर्ण देश लॉकडाऊन केला. परंतु तरुण याकडे दुर्लक्ष करत आहेत. अशा पद्धतीने तरुण एकत्र येत असल्याने सोसायटीतील काही रहिवासी चिंता व्यक्त करत आहेत.
पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष
काही ठिकाणी तरुण सोसायटीच्या गेटवर जमा होत आहेत. बाहेर काय हालहवाला सुरू आहे. पोलीस येत आहेत का, कोण रस्त्याने फिरत आहे हे पाहण्यासाठी जमा होत असल्याने करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासन वारंवार अंतर ठेवा, एकत्र येऊ नका, घराबाहेर पडू नको असे सांगत असतानाही काही तरुण नियमांचा भंग करत आहेत. सोसायटीच्या गेटवर किंवा रस्त्याने पोलीस पाहणी करण्यासाठी आले की हा सर्व घोळखा सोसायटीकडे धूम ठोकत पोलिसांना वाकडे दाखवत असतात. पोलीस गेले की पुन्हा जमा होणे, रस्त्यातच खेळत बसणे. पोलीस प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या सूचनांकडे सोसायटीतील तरुण दुर्लक्ष करत आहेत.
संचारबंदीचा काही परिणाम नाही
संचारबंदीमध्ये नागरिकांनी रस्त्याने ये-जा करण्यास बंदी आहे. विनाकारण भंटकती करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतात. अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना फक्त यातून सूट दिली जाते. नागरिकांनी घरात बसणे बंधनकारक असताना बऱ्याच सोसायट्यांमध्ये नागरिक या नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांचीदेखील डोकेदुखी वाढली आहे. प्रत्येक सोसायटीत एक पोलीस नियमने तर शक्य नाही. तेव्हा नागरिकांनी नियमांचे पालन करून शासनास सहकार्य करावे.