मेलबर्न – करोनाच्या धोक्यामुळे जागतिक क्रीडा क्षेत्रातील अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत तर, काही स्पर्धा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. सध्याची परिस्थिती पाहता करोनाचा धोका संपण्यास किती काळ लागेल हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. मात्र, हे चित्र स्पष्ट दिसत असूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ऑस्ट्रेलियात होणारी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत होणारच असे सांगितले आहे.
करोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असून अनेक देशांत तर आणीबाणीची स्थिती आहे. भारतातही करोनाचा फटका इंडियन प्रीमिअर लीगसह (आयपीएल) अनेक स्पर्धांना बसलेला आहे.आयपीएलसह अनेक स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, आम्ही योग्य ती काळजी घेऊ व ही स्पर्धा यशस्वी करून दाखवू असे सांगत आयसीसीने आपला अट्टहास काही सोडलेला नाही.
अनेक देशांनी आपल्या सर्व मोठ्या स्पर्धा स्थगित केल्या आहेत, तसेच विश्वकरंडक स्पर्धेच्या पात्रता स्पर्धाही पुढे ढकलल्या आहेत. तरीही आयसीसी मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहे. कोरोनावर येत्या काळात संपूर्ण नियंत्रण मिळविण्यात यश येईल असा आशावाद व्यक्त करत येत्या 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणारच, असेही आयसीसीने स्पष्ट केले आहे.