लखनौ – कॉंग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान बनावेत अशी आता प्रत्येकाचीच इच्छा आहे. त्यांना पंतप्रधान बनवण्याची सर्वांत मोठी जबाबदारी आपल्यावर आहे, असे साकडे उत्तरप्रदेशातील कॉंग्रेसजनांना प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी घातले.
कॉंग्रेसने राय यांच्यावर नुकतीच उत्तरप्रदेश शाखेची धुरा सोपवली. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर राय यांनी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पंतप्रधानपदासाठी राहुल यांचे नाव प्रोजेक्ट करत कॉंग्रेसजनांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला.
आपण पक्षासाठी आणि राहुल यांच्यासाठी जोमाने कार्य करू. तसे केले तरच आगामी लोकसभा निवडणुकीत आपण आपली ताकद दाखवू शकू, असे त्यांनी म्हटले. उत्तरप्रदेशात लोकसभेच्या सर्वांधिक जागा आहेत. त्यामुळे केंद्रातील राजकारणात त्या राज्याला मोठे महत्व आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून त्या राज्यात कॉंग्रेसची पीछेहाट सुरू आहे.
आता लोकसभा निवडणूक आठ महिन्यांवर येऊन ठेपली असताना कॉंग्रेसने राय यांना प्रदेशाध्यक्ष केले आहे. पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. अशात त्यांनी थेट पंतप्रधानपदासाठी राहुल यांचे नाव पुढे करून चर्चेसाठी मुद्दा पुढे आणला आहे.
बघेल यांनीही केले नाव पुढे
छत्तिसगढचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते भुपेश बघेल यांनीही राहुल यांचे नाव पुढे केले. इंडिया या विरोधकांच्या आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल असावेत असे वाटते, असे ते पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हणाले. भारत जोडो यात्रेमुळे राहुल यांच्या लोकप्रियतेत भर पडली. त्यामुळे भाजप अस्वस्थ झाला आहे. त्यातून राहुल यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्याची, सरकारी बंगला सोडायला लावण्याची पाऊले उचलण्यात आली, असा आरोप बघेल यांनी केला.