पुणे – नुकताच झालेला अवकाळी पाऊस आणि शेतात पाणी नसल्याने त्याचा सर्वाधिक फटका भाजीपाल्यास बसला आहे. बऱ्याच भाजीपाल्याच्या भावात वाढ झाली आहे. तर, काही भाज्या मिळेनाशा झाल्या आहेत. सध्या, लसणाने घाऊक बाजारात १६० रुपयांचा आकडा पार केला आहे. किरकोळ बाजारात ५० ते ६० रुपये पावकिलो भावाने विक्री होत आहे.
अवकाळी पावसचा मोठा फटका भाजीपाला उत्पादक शेतकरी वर्गाला बसला आहे. आता, येथून भाजीपाल्याचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या, किरकोळ बाजारात बटाटे, भेंडी, कोबी, टोमॅटोचे भाव चढे आहेत. बटाटे ३० ते ४० रुपये किलो, टोमॅटो ३०, भेंडी ६० रुपये किलो, कोबी ६० रुपये किलोने विक्री सुरू आहे. पालेभाज्याही महाग झाल्या आहेत. मेथी, शेपू, चुका, पालक १० ते २० रुपयांपर्यंत जुडी मिळत आहे.
“मार्केटयार्ड बाजारात पालेभाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे भाव चांगलेच चढे आहेत. स्थानिक व परराज्यांतून लसणाची आवकही कमी आहे. त्यामुळे लसूण, टोमॅटो, कोबी, भेंडीचे भाव चढे आहेत. अवकाळीत भिजल्याने कांद्याचे भाव अत्यंत कमी झाले आहेत. अवकाळी पावसामुळे पालेभाज्यांना फटका बसला आहे.” – रघूनाथ येदोवते, घाऊक व्यापारी, मार्केट यार्ड