मुंबई – विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांकडून पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. यावेळी आमदार नितेश राणेदेखील इतर भाजपा आमदारांसोबत आंदोलनात सहभागी झाले होते. भाजपा आमदारांकडून पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली जात असताना शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सभागृहात पोहोचले. यावेळी नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज देण्यास सुरुवात केली.
झाला प्रकार अत्यंत आक्षेपार्ह होता आणि अशोभनीय होता. त्यामुळे नितेश राणे निलंबित करण्यात यावे अशी मागणी शिवसेना आणि राज्यातील महाविकास आघाडीतील इतर पक्षांच्या सदस्यांनी केली.
नितेश राणेंनी केलेल्या कृत्यावरुन याआधीही विधासभेत चर्चा घेण्यात आली होती. त्यावेळी भाजपा नेत्यांनीही नितेश यांचे समर्थन करण्याचे टाळले होते. त्यानंतर आता पुन्हा शिवसेनेकडून नितेश राणे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सोमवारी विधानसभेत आमदार भास्कर जाधव यांनी नितेश राणे यांना कायमचेच निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
या सभागृहामध्ये तीन दिवसांपूर्वी मी काही अंगविक्षेप केल्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि सभागृहाने मला माफी मागायला सांगा, निलंबित करायला सांगितले. त्यानंतर मी माफी देखील मागितली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासंदर्भात विधीमंडळाच्या पायऱ्यावर बसून विरोधकांनी आवाज काढले. आमदार सुनील प्रभू यांनी तो विषय मांडल्यानंतर विरोधीपक्ष नेत्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सल्ला दिला. असे वर्तन करू नये असे त्यांच्या पक्षातील नेते देखील म्हणाले होते तरीही नितेश राणे हे जुमानत नाहीत.
बाहेर जाऊन माध्यमांसमोर बोलतच होते याकडे भास्कर जाधव यांनी लक्ष वेधले. राणेंना तेव्हाच थांबवले असते तर काळ असा सोकावला नसते असे त्यांनी नमूद केले. त्यांना (नितेश राणे) भाजपने घडवले आहे की त्यांनी भाजपला घडवले अशा आशयाची विचारणाही जाधव यांनी यावेळी केली.