पाटणा – बिहार निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल, कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांची आघाडी झाली होती. मतदारांचा आणि विशेषत: युवकांचा राजदचे नेते तेजस्वी यांना जोरदार प्रतिसाद मिळत होता.
त्याचे स्वरूप पाहता या निवडणुकीत महाआघाडी बाजी मारणार असे वाटत होते. मात्र कॉंग्रेसला 70 जागा सोडल्या गेल्या व तोच निर्णय चुकीचा ठरला असे सध्यातरी आकडेवारीवरून म्हणता येउ शकते, असे राजकीय निरिक्षकांचे म्हणणे आहे.
महाआघाडीच्या जागावाटपात राजदने 144 जागा लढवल्या होत्या. कॉंग्रेसला 70 जागा देण्यात आल्या. माकप 4, भाकप 6 तर सीपीआय (एमएल) पक्षाला 19 जागा सोडण्यात आल्या होत्या. तब्बल 70 जागा लढवूनही कॉंग्रेस 20 ठिकाणीच आपला प्रभाव पाडू शकली आहे.
कॉंग्रेसची अशी कामगिरी पहिल्यांदाच झालेली नाही. मात्र यावेळी संधी असतानाही कॉंग्रेसला जादा जागा सोडण्याचा निर्णय तेजस्वी व पर्यायाने महाआघाडीची समीकरणे बिघडवण्यास कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट होत आहे.
2017 च्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या वेळीही असेच झाले होते, याकडे जाणकारांनी लक्ष वेधले. 403 सदस्यसंख्या असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने 289 जागा लढवल्या. तर कॉंग्रेसला 105 जागा सोडण्यात आल्या होत्या.
तेव्हाही असाच निकाल लागला होता. 105 पैकी केवळ 7 जागांवर कॉंग्रेस उमेदवार विजयी झाले व अन्य ठिकाणी त्यांना सपशेल पराभव पत्करावा लागला. त्यामुळे अखिलेश यांचेही गणित बिघडले व भाजपला सत्ता काबिज करता आली.
अत्यंत छोट्या समजल्या जाणाऱ्या आणि दोन अडीच जिल्ह्यांपुरत्या मर्यादीत असणाऱ्या अपना दल या पक्षाचीही कामगिरी कॉंग्रेसपेक्षा चांगली झाली व त्यांनी 9 जागा पटकावत चौथे स्थान प्राप्त केले. आता बिहारमध्ये कॉंग्रेसला कमी जागा दिल्या असत्या तर महाआघाडीची कामगिरी आणखी सरस झाली असती असा दावाही काही राजकीय पंडितांनी केला आहे.
दरम्यान, कॉंग्रेस नेते आणि राज्यसभा सदस्य नासीर हुसैन यांनीही काही बाबी मान्य केल्या आहेत. पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी राज्यभर प्रचार केला. मात्र पक्षसंघटनेत प्रचंड त्रुटी असून त्याकडे आम्हाला लक्ष द्यावे लागेल असे त्यांचे म्हणणे आहे.