नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केंद्रीय कृषी कायद्यांची खिल्ली उडवली. त्या कायद्यांचा एकही फायदा नाही; मात्र तोटे अनेक आहेत, असे त्यांनी म्हटले.
कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे कुठले नुकसान होणार नसल्याचे भाजप म्हणत आहे. पण, त्या कायद्यांचे फायदे काय आहेत? बाजार समित्यांबाहेर कुठेही शेतकऱ्यांना त्यांचा माल विकता येईल, असे सांगितले जात आहे.
मात्र, बाजार समित्यांबाहेर शेतमाल निम्म्या किमतीत विकला जातो. तो फायदा कसा काय, असे सवाल केजरीवाल यांनी ट्विटरवरून केले. कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना बहुतांश विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यामध्ये केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपचाही समावेश आहे.
त्यातून दिल्लीच्या सीमांवरील आंदोलनस्थळाला केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी भेट दिली होती. कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी दिल्ली विधानसभेचे विशेष अधिवेशनही झाले. त्यावेळी केजरीवाल यांनी त्या कायद्यांच्या प्रती फाडल्या होत्या. आपकडून सातत्याने त्या कायद्यांना विरोध दर्शवला जात आहे.