जळोची -बारामती तालुक्यातील वाकी गावामध्ये शेती सिंचनाची कोणतीही सोय नसल्यामुळे पाणी सोडण्याची अनेक दिवसांची ग्रामस्थांची मागणी होती. विधानसभा निवडणुकी वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाकी तलावामध्ये कायमस्वरूपी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते. त्याच अनुषंगाने सर्व बाबींची पूर्तता करून कालच तलावामध्ये पुरंदर उपसा सिंचन योजना अंतर्गत खडकवासला कालव्याचे ओव्हर फ्लोचे पाणी सोडण्यात आले.
या प्रसंगी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर, कार्यकारी अभियंता कानिटकर, दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप, कार्यकारी अभियंता काझी, उपअभियंता भुजबळ, संचालक लालासाहेब नलवडे, उपसरपंच दादासाहेब जगताप, सरपंच दादासाहेब कारंडे व मुर्टी वाकी मोराळवाडी व कानडवाडी येथील शेतकरी व प्रमुख उपस्थित होते. वाकी येथील लघु प्रकल्प पाटबंधारे तलाव असून त्याची क्षमता 102 एमसीएफटी क्षमतेचा असून यातील पाण्याचा फायदा शेती व पिण्याच्या पाण्यासाठी होणार असून मुर्टी, वाकी, मोराळवाडी, कानाडवाडी, चोपडज व वडगाव निंबाळकर परिसरातील शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत आश्वासन दिल्याप्रमाणे हे काम मार्गी लावले आहे, असे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांनी सांगितले.