बारामती – करोनासारख्या वैश्विक महामारीचा फटका गणेश मूर्तिकारांना बसला. करोनामुळे श्री गणेश मूर्तिंना मागणी नसल्याने कुंभारांचे 900 कोटींचे नुकसान झाले आहे. कुंभार कारागिरांना नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून मदतीचा हात मिळावा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र कुंभार समाजाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती अखिल भारतीय प्रजापती महासंघाच्या माती कला विकास सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ता कुंभार यांनी दिली.
राज्यात 25 हजारपेक्षा जास्त कुटुंबे ही गणपती मूर्ती बनवून आपला उदरनिर्वाह करीत असतात. दिवाळी झाल्यानंतर गणपती बनविणेचे काम ते अहोरात्र चालू करतात. जागेच्या उपलब्धतेनुसार मोठे व छोटे गणपती बनवून ते आपले कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. करोना रोगाचे थैमान राज्यात सुरू होण्याआधी पूर्व अनुभवाप्रमाणे 4 फुटांपेक्षा जास्त उंचीचे गणेशमूर्ती ज्याला राज्य शासनाने बंदी घातली, अशा 10 हजारपेक्षा जास्त मूर्ती या कारागिरांकडे तयार झालेल्या होत्या. या मूर्ती मुख्यतः पीओपीच्या असून राज्य शासनाने बंदी घातलेमुळे अंदाजे 700 कोटी रुपयांच्या मूर्ती कारागिरांकडे तशाच पडून आहेत. 1 जानेवारीपासून म्हणजे पुढच्या गणेश उत्सवासाठीही पीओपी बंदीमुळे या मूर्ती कारागिरांना विकता येणार नाहीत. त्यांचे पाण्यात विसर्जनही करता येणार नाही. मूर्ती ठेवण्यासाठी करागिरांकडे जागा नाही. करोनाच्या प्रादुर्भावामुळे वरील मूर्तीशिवाय कारागिरांनी नेहमी प्रमाणे बनविलेल्या छोट्या पीओपीच्या मूर्तीही फार कमी प्रमाणात केवळ 40/50 टक्के विकल्या गेल्या आहेत. त्यामुळे हजारो मूर्ती आज राज्यातील कारागिरांकडे शिल्लक आहेत.
आमचे प्राथमिक सर्वेक्षणानुसार 200 कोटी रुपयांच्या गणपती मूर्ती आज राज्यातील कारागिरांकडे शिल्लक आहेत. मूर्ति बनविणारे हे आमचे कुंभार कारागिर अतिशय गरीब असून बहुतांश कारागिरांचा प्रपंच हा केवळ गणेश मूर्ती व्यवसायावर चालत आहे. करोनाच्या संकटामुळे यावर्षी उपासमारीची वेळ आली आहे. तसेच हा व्यवसाय हा मुख्यतः खासगी कर्ज घेऊन होत असल्याने व या वर्षीचे कर्ज परत न केल्यामुळे कारागिरांची पिळवणूक सुद्धा होऊ शकते. कुंभार हा एक शांतता प्रिय समाज असून समाजाने कधीही आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केलेली नाहीत; परंतु करोना संकट हे एक फार मोठे जीवन उद्ध्वस्त करणारे नैसर्गिक संकट असून शासनाने नैसर्गिक संकट समयी समाजातील अनेक घटकांना नुकसान भरपाई दिलेली आहे. राज्यातील गणपती कारागिरांकडे असणारे गणेशमूर्तींचा पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच शिल्लक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी कुंभार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.