‘कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन !’ हा विचार स्वतःसह असंख्य मावळ्यांमध्ये भिनवून मराठी स्वराज्य स्थापणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाणलोट व्यवस्थापन, कौशल्य नीती, युद्धनीती, शेतीविषयक धोरण, गनिमी कावा इत्यादी धोरणांचा जगातल्या विविध प्रगत देशांनी आपल्या विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे. यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक कीर्तिचे राजे आहेत, यात शंकाच नाही. ते स्वत:च राज्य निर्माते होते. मात्र, त्यांच्या काळात जागतिक पातळीवरचे तंत्रज्ञान विकसित झाले होते. विविध शस्त्रास्त्रे तसेच वैविध्यपूर्ण व उपयुक्त वस्तूंची निर्मिती झाली होती. फक्त जागतिक पातळीवर त्याकाळी ते पोहोचू शकले नव्हते. त्याकाळी भारत हा स्थितीशील नसून गतिशील होता हे मावळ तालुक्याच्या अभ्यासातून स्पष्ट होते. कसे, ते जाणून घेऊया या महत्त्वपूर्ण लेखातून !
शिवकालीन जागतिक तंत्रज्ञान आणि मावळ
इतिहासाचा सर्वांगाने अभ्यास करतांना प्राथमिकता असते ती विषयाची व कालखंडाची निवड आणि तदनंतर संदर्भांचा तपशिल काढून त्याचा अन्वयार्थ लावण्याची. सदर लेखात शिवकाळात जगातील बदलते तंत्रज्ञान व त्याचे मावळ तालुक्यात प्रतिबिंबीत होणारे चित्र यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. लढाया व विररसाच्या पलीकडे जावून इतिहासाचा तंत्रज्ञानासंबंधी अभ्यास नव्याने होणे आवश्यक आहे.
आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या काळात नव्याने येवू घातलेल्या शोधांचा बोध अल्पकाळात होणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाने पिछाडलेला समाज नव्या जागतिक आव्हानांना तोंड देवू शकत नाही याची प्रचिती आपल्याला इतिहासातील 10 मे 1818 सालच्या रायगड लढाईतून स्पष्ट होते. ब्रिटिशांच्या तोफांचे गोळे येवून रायगड उध्वस्त झाला मात्र त्यांच्यापर्यंत आपल्या तोफांचे गोळे पोहोचू शकले नाहीत.
ब्रिटिशांनी भारत हस्तगत केला तो त्यांच्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर मात्र शिवकाळातील अभ्यास करतांना स्थानिक राजसत्ता या अद्ययावत होत्या असे अभ्यासाअंती निदर्शनास येते. जागतिक बदलते तंत्रज्ञान येथील सत्ताधीशांना माहित होते याचा संदर्भ पुरातत्वीय अभ्यासातून देता येतो. मावळ तालुक्यातील लेणी व दुर्ग यांच्या अभ्यासांती जागतीक तंत्रज्ञानाची माहिती स्थानिकांस होती हे ध्यानी येते.
तोफांचा शोध मुघलांनी भारतात आणला; मात्र बदलत्या संहारक शस्त्रास्त्रांना निकामी करण्याचे तंत्रज्ञान भारतीयांनी विकसीत करून त्या तोफा निकामी ठरविल्या. जर तोफांच्या जोरावर गिरीदुर्ग जिंकता आले असते तर महाराष्ट्रातले सर्वच दुर्ग मुघल आक्रमणास बळी पडले असते. तोफांना निकामी ठरवितांना दुर्गांच्या रचनेत विशेष बदल करून गोमुखी पद्धत शिवाजी महाराजांनी अस्तित्वात आणली. राज्यव्यवहार कोषात त्यास जिभी असे संबोधले आहे. जागतिक शोधांची कल्पना स्थानिक सत्ताधिशांस असल्याने परकीय तंत्रज्ञावर आपला इलाज प्रभावी पडणारे तंत्रज्ञान राजसत्तांनी विकसीत केल्याचे पुरावे मावळ तालुक्यातील दुर्गांच्या अभ्यासातून दिसून येते.
लोहगड व तिकोणा या दोहोंच्या बुरूजांचे तंत्रज्ञान त्या काळातील अद्ययावत स्वरूपाचे होते. याचे कारण परकीय राष्ट्रांतील संहारक तंत्रज्ञानाची कल्पना मराठी राज्यास होती. ऍबे कॅरे या फ्रेंच प्रवाशाच्या प्रवास वर्णनात ‘ही ईज मास्टर – द आर्ट ऑफ फोर्टीफिकेशन’ असे शिवाजी महाराजांच्या बद्दल लेखन केले आहे. तोफांच्या शोधा आधी ‘मंजनीक’ नावाचे एक यंत्र जे किल्ल्याच्या आत मोठाले दगड फेकायचे, ते देखील आपल्याकडे निर्माण झाले होते. त्यापुढील तंत्रज्ञान म्हणजे तोफ होय. मावळ तालुक्यातील दुर्गांवर शेकडोंनी तोफा शिवकाळात उपलब्ध असल्याचा पुरावा ऐतिहासिक कागदपत्रांतून मिळतो. तोफा चालविणाऱ्यांस गोलंदाज म्हटले जात असे.
तोफा उत्तम प्रतिच्या बनविण्यासाठी महाराष्ट्रात निजामशाहीनी पुढाकार घेतल्याचे दिसून येते. रूमीखान दख्खनी याने निजामशाहीत महाबलाढय तोफा ओतल्या. नवनवीन तंत्रज्ञान विकसीत करून लवकर थंड होणाऱ्या, दळणवळणास सोप्या, लांब पल्ल्याच्या व अद्ययावत असे प्रयोग तत्कालीन शाहींनी केले. अदिलशाहीने ‘बांगडी तोफा’ या नव्या तंत्रज्ञानयुक्त बनवून तोफांच्या दुनियेतील नविन आविष्कार केला.
मावळ तालुक्यातील दुर्गांवर मराठेशाहीतील ओतिव तोफा आजही निदर्शनास येतात व यातून मावळातील तत्कालीन तंत्रज्ञानाची कल्पना येते. शिवाजी महाराजांनी ब्रिटिशांकडून तोफा विकत घेतल्या होत्या. लोहगड दुर्गावर ब्रिटिश तोफा आजही चांगल्या स्थितीत दिसून येत आहेत. तंत्रज्ञानाविषयी पाठ फिरविण्याची वृत्ती वा आसुया मराठेशाहीकडे शिवकाळात दिसून येत नाही. याउलट जागतीक तंत्रज्ञानाविषयीची ओढ शिवकाळात होती याचे संदर्भ इतिहासातून मिळतात. निकोलाव्ह मनुची याच्यासोबत शिवाजी महाराजांनी रात्रीपर्यंत केलेल्या चर्चेतून इतर राष्ट्रांमधील माहिती व तंत्रज्ञान विषयी चर्चा झाली होती.
मावळ तालुक्यातील शिवकालीन तंत्रज्ञान तपासतांना बहुतांश गोष्टींतून ते समोर येत असले तरी काही प्रातिनिधीक गोष्टींतून हे समाजास समजू शकते. मावळात मध्ययुगात लढलेल्या अनेक घराण्यांतून परंपरागत जतन केलेल्या तलवारींच्या मध्ये धोप तलवारी मोठया संख्येने आहेत. प्रस्तुत लेखकाच्या शिवशाही संग्रहालयास यातील बहुतांश घराण्यांनी या तलवारी भेटी दाखल दिल्या आहेत. या तलवारी मावळी मुलखात मोठया संख्येने दिसून येतांना यातील तंत्रज्ञान हे मराठी मुलखात तयार झाले असल्याचे स्पष्ट होते. धोप तलवारींना एकुण 23 भाग असतात. या तेवीस भागांचा तपशील न देता निष्कर्ष पहावयाचा झाला तर तत्कालीन अद्ययावत व नवे तंत्रज्ञान म्हणून त्याकडे पाहता येते.
अलीकडच्या काळापर्यंत पेटंट घेण्याची कला भारतीयांकडे मोठया प्रमाणावर नव्हती. शोध भारतीयांचे असले तरी पेटंट्स परकीय राष्ट्रांकडे दिसून येतात. यात शिवकालीन शेवयाच्या पाटाचा संदर्भ देणे सयुक्तीक आहे. शेवयाच्या पाटास लाकडात थ्रेड करून त्याची तत्कालीन अद्ययावत तंत्रज्ञानातील घडणावळ दिसून येते. नट व बोल्ट तंत्रज्ञान भारतात व त्यातही मराठी मुलूखात संशोधित झाले होते. मात्र आज त्याचे हे वस्तूरूपी अवशेष आपल्याकडे शिल्लक राहीले असून यासंबंधी पहिले मराठी राज्यात याचा वापर झाला असल्याचे पेटंट्स आपल्याकडे नाहीत.
मावळातील खेडयात मिळालेली मल्टीयुज विळी ही आजच्या तंत्रज्ञानाशी स्पर्धा करणारी ठरते. पंचअंगी विळी आजही कुठे पहावयास मिळत नाही, मात्र शिवकाळात मराठी राज्यात अशा स्वरूपाच्या तत्कालीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठया प्रमाणावर केला गेलेला निदर्शनास येतो. मावळातील स्थानिक लोहारांनी तयार केलेल्या वस्तू, तोफगाडयाच्या धावा, शस्त्रास्त्रे व अवजारे यांच्यात जगाशी स्पर्धा करणारं नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान होते मात्र त्याची मांडणी करण्यास स्थानिक समाज मागे पडला असे दिसून येते. शिवकालीन दुर्गांचा अभ्यास करतांना मोडी दस्तांमध्ये सैनिकांपेक्षा सुतारांचा पगार साधारणतः दुप्पट दिसून येतो. याचे कारण श्रम व कौशल्य जे अत्याधुनिक व अद्ययावत होते.
विसापूर वरील शौचकुपाच्या रचनेतील एक कमोड स्वरूपाची बांधणी पाहिल्यावर हे ‘पाश्चिमात्य पद्धतीचे आहे’ हा समज दुर होतो. अहमदनगर येथील पुराण वस्तू संग्रहालयातील बाथटब देखील हे शोध मराठी मुलूखातील नवनवीन शोध असल्याचे निदर्शक आहे. मराठी मुलूखातील अठरा कारखाने, आरमार व जल व्यवस्थापन(धरणे व बंधारे) हे तत्कालीन जागतिक तंत्रज्ञानाचा विचार करून निर्मिलेले दिसून येते.
सारांश मावळ तालुक्यात जागतिक बदलत्या तंत्रज्ञानाचे प्रतिबिंब शिवकाळात दिसून येते. सुई दाभणीच्या शोधापासून विमानाच्या शोधापर्यंत मराठी मावळ मुलखात तंत्रज्ञान विकसीत झाले. मात्र इंग्रजी भाषेत सदर ज्ञान तंत्रज्ञान न आल्याने व परकीयांच्या संकल्पना आजही हरएक क्षेत्रात मान्यतेच्या असल्याने तसेच पाश्चिमात्यांनी मान्य केले तरच आमचे तंत्रज्ञान श्रेष्ठ ठरेल या भारतीय मनोवृत्तीने आपला देश तंत्रज्ञानात स्थितीशिल असल्याचे चित्र ब्रिटिशांनी उभे केले. भारत हा स्थितीशील नसून गतिशील होता हे मावळ तालुक्याच्या अभ्यासातून आलेल्या संदर्भांवरून वाचकांना मिळतील ही अपेक्षा.