अरुण गोखले
खरं तर अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. त्या भागल्या तर त्याने सुखी अन् संतुष्ट असायला हवे. भुकेल्या पोटास अन्न, अंग झाकायला वस्त्र, आणि ऊन, थंडी, पाऊस, वारा यापासून बचावासाठी डोक्यावर छप्पर हवं असतं. या तीनही गोष्टी मानवी जीवनाच्या चरितार्थासाठी अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळेच त्यांची गणना ही जीवनावश्यक वस्तूमध्ये केली जाते.
या गोष्टी जर माणसाला मिळाल्या नाहीत तर त्याला नीटपणे जगता येणार नाही. त्यामुळेच ज्याने चोच दिली तो चाराही देतोच. पोटापुरते अन्न, अंग झाकायला कपडा आणि डोक्यावर छप्पर हे प्रत्येकाला कसे मिळेल, ह्याची त्या जगनियत्याने सोय करून ठेवलेली असते. आपल्या आवश्यक त्या गरजा भागविण्याचा, त्या पूर्ण करण्याची तजवीज तो करीत असतो.
या संदर्भात एक संतवचन आहे. ते असं म्हणतात की, “भगवंत माणसाच्या गरजा पूर्ण करतो अपेक्षा नाही’. अपेक्षांचा जन्म हा जरी गरजेच्या पोटी होत असला तरी अपेक्षा या आवश्यकेतेतूनच आलेल्या असतात असे म्हणता येत नाही. उलटपक्षी नीट विचार केला तर माणसाच्या अपेक्षा ह्या त्याच्या गरजेतून नाही तर स्वार्थ, लोभ, हाव ह्यातून जन्म घेत असतात. माणसाचं हे हवं ते हवं हे वाढायला लागलं की, आपोआपच त्या गरजेचे रूपांतर अपेक्षेत कधी होते ते माणसालाच कळत नाही.
भुकेला चटणीभाकरी गोड लागत असते. पण जेव्हा त्या भुकेची जागा नकळत रसनेच्या तृप्तीकडे जाते, तेव्हा भाकरी नको पोळी हवी, पोळी नको पुरी हवी, अशी वाढत जाते. या अशा वाढत गेलेल्या अपेक्षेला कधी पूर्तीचे वरदान तर कधी अतृप्तीचा शाप मिळत असतो.
जी गोष्ट अन्नाची तीच वस्त्र आणि निवाऱ्याची सुद्धा. कपडा सुती नको मलमली हवा, साधा नको रेशमी हवा, हलका नको भारी हवा. हे हवंपण त्याला चिकटत. भरलेलं पोट आणि कष्टाने थकलेल्या शरीराला झोपडीत किंवा साध्या घरातही आनंदाने झोप येते. पण आम्ही अपेक्षा करतो ती महालाची, उंची गाद्या गिरद्यांची आणि त्या आमच्या अनावश्यक अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की आम्ही दु:खी कष्टी होतो. गरिबीतलं समाधान अपेक्षांच्या श्रीमंतीत लाभत नाही. त्यासाठीच गरज आणि अपेक्षा ह्यातला नेमका फरक हे आवर्जून ध्यानात घ्यायला हवे.