नगर – राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून, त्यांना मुबलक व माफक दरात वीजपुरवठा कसा करता येईल, यासाठी प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री कृषी सौर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 24 तास वीज उपलब्ध करून देण्यासाठीचे कामकाज हाती घेण्यात आले आहे. लवकरच शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा व एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करून शेतकरी व विशेषतः तरुण शेतकऱ्यांनी शेती करायला हवी, असे प्रतिपादन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.
जेऊर व परिसरातील वाड्यावस्त्यांवर कृषी विभाग व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवार फेरीचे आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ना. तनपुरे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत अडचणी समजून घेतल्या. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, जि. प. सदस्य गोविंद मोकाटे, उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे, मंडळ कृषी अधिकारी सूर्यकांत शेकडे, संजय मेहेत्रे, संजय मेचकर, बहिरवाडीचे सरपंच विलास काळे, राजू दारकुंडे, संजय आवारे, दत्तात्रय आवारे, दत्ता म्हस्के, डॉ. अजय मगर, दिगंबर मगर, बाळासाहेब मगर, संजय ससे, रामदास ससे, दत्तात्रय म्हस्के, बाळासाहेब मोकाटे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
तनपुरे पुढे म्हणाले की, कृषी विभाग व महात्मा फुले कृषी विद्यापीठ हातात हात घालून काम करीत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
डॉ. शरद गडाख यांनी विद्यापीठाच्या विविध योजनांची माहिती देऊन एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब कसा करावा, यावर सखोल मार्गदर्शन केले. कृषी अधीक्षक जगताप यांनी पीक व्यवस्थापन व कीड व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे यांनीही मनोगत व्यक्त केले.