नगर -बोल्हेगाव, नागापूर परिसर दरवर्षीच्या पावसाळ्यात बळी ठरतो. आतही पावसाळा तोंडावर आहे. त्यामुळे या भागातील नालेसफाई तातडीने होण्याची गरज आहे. अन्यथा मागील वर्षीप्रमाणे पुन्हा आपत्तीला तोंड द्यावे लागेल, अशी भूमिका शिवसेना नगरसेविका कमल सप्रे यांनी महापालिका आयुक्तांकडे मांडली आहे.
या उपनगरांत मागील वर्षी नागरीकांना मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागले होते. अनेकांच्या घरात पाणी घुसले होते. त्यातून घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याही तशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भागात तातडीने सफाईची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी सप्रे यांनी केली आहे.
दरम्यान, या भागातील अनेक विकासकामे मंजूर आहेत. तथापि, करोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर ही कामे रखडली होती. त्यामुळे या कामांचा मुदतवाढ देऊन ती पुन्हा तातडीने करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही सप्रे यांनी केली आहे.