वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे, वडगाव व कामशेत परिसरात सोमवार सायंकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह व ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली. या पावसाने आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठा हवालदिल झाला आहे.
मावळ तालुक्यात सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तीव्र उष्णता होती. सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी मुक्या जनावरांसाठी उगड्यावर ठेवलेला चारा, गोवऱ्या यांचा पावसापासून बचाव करण्यासाठी मोठी धांदल उडाली. तीव्र उन्हामुळे कुरडई, पापड व शेवया वळवण्यासाठी ठेवल्याने महिलांचीदेखील धावपळ झाली.
या पावसाने आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. मेंढपाळांच्या मेंढ्या झोडपल्याने काही मेंढ्या आजारी पडल्या आहेत. त्यांचा उघड्यावरचा संसार भिजला. पायी निघालेल्या मजुरांना निवाऱ्यासाठी वाड्यावस्त्यांवर, झाडांखाली आश्रय घ्यावा लागला. या पावसाने वातावरणात मात्र गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे उन्हाने त्रस्त झालेले नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.