नवी दिल्ली – घराणेशाहीचा भ्रष्टाचार देशातील काही राज्यांमधील राजकीय संस्कृतीचाच एक हिस्सा बनला आहे. देशासमोरचे हे एक मोठे आव्हान असून या घराणेशाहीच्या भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई आवश्यक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. “सीबीआय’ने आयोजित केलेल्या दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधातील तीन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनाच्या सत्रामध्ये ते बोलत होते.
भारतासारख्या गरीब देशात भ्रष्टाचाराला स्थान असता कामा नये, भ्रष्टाचार संपवणे ही कुठल्या एका संस्थेची जबाबदारी नसून आपण सर्वांनी मिळून भ्रष्टाचार संपवायला हवा असेही त्यांनी म्हटले आहे.
एखाद्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये कृतीशून्य राहिल्याने भविष्यातील घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा पायाच रचला जातो, असेही ते म्हणाले.
घराणेशाहीतील भ्रष्टाचार एका पिढीकडून दुसऱ्या पिडीकडे हस्तांतरित केला जातो. अनेक दशके सुरू असलेल्या या भ्रष्टाचाराचे आव्हान देशासमोर अतिशय भयंकर अशा स्वरुपात उभे राहते. जेव्हा भ्रष्टाचारी लोकांच्या एका पिढीला पुरेशी शिक्षा दिली जात नाही, तेव्हाच्या त्याच्या पिढ्या अधिक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात, असे आपण गेल्या काही दशकांमध्ये पाहिले आहे. कुटुंबातील एखाद्या भ्रष्ट व्यक्तीला शिक्षा होत नाही किंवा फारच थोडी शिक्षा झालेली दिसते तेंव्हा भ्रष्टाचार करण्याचे धाडस अनेक पटींनी वाढते. त्यातूनच काही राज्यांमध्ये घराणेशाहीचा भ्रष्टाचार हा राजकीय संस्कृतीचाच भाग बनला आहे. अनेक पिढ्यांपासून सुरू असलेला भ्रष्टाचार एखाद्या वाळवीप्रमाणे देशाला संपवत चालला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
लोकांनीच भ्रष्टाचार संपवायला हवा, तसेच भ्रष्टाचाराविरोधात लढाई मजबूत करायला हवी, त्याच प्रमाणे भ्रष्टाचाराला प्रतिबंध घालण्यासाठी निर्माण केलेल्या विविध संस्थांमध्ये ताळमेळ असायला हवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
भ्रष्टाचारामुळे विकासाला खीळ बसते, म्हणूनच विकासासाठी प्रशासकीय व्यवस्था मजबूत असायला हवी आणि त्यादृष्टीने भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी एक रणनीती आखायला हवी. त्यासाठीच काळा पैसा रोखण्यासाठी समिती स्थापन करून भ्रष्टाचाराविरोधातली आमची वचनबद्धता आम्ही दाखवून दिली आहे. त्यामुळे आता विविध घोटाळ्यांचा जमाना तसेच नियुक्त्यांसाठी शिफारशी करण्याचा जमाना आता मागे पडला आहे. त्यामुळे गरिबांचा पैसा, आता त्यांना मिळू लागला आहे असेही मोदी यांनी स्पष्ट केले.