खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे प्रसिद्ध काव्य म्हणजे
अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताले चटके
तव्हा मिळते भाकर
जीवनाचे तत्त्वज्ञान एकवटलंय ते या चार ओळीत आणि हीच जीवन पद्धती आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. चटके मग ते परिस्थितीचे असोत वा माणसांनी दिलेले असोत कारण काहीही असेल; पण चटके बसल्याशिवाय भाकरी मिळत नाही आणि म्हणूनच मिळालेल्या भाकरीला किंमत आहे ती या चटक्यांमुळेच. सुखाची अनुभूती मिळविण्यासाठी दुःखाच्या अनुभवातून जावे लागते. कारण सुखाची किंमत चुकवणे म्हणजे दुःखाला सामोरे जाणे. जगद्गुरू तुकोबारायांचे प्रमाण वचन खूप काही सांगून जाते ते म्हणतात-
सुख पाहता जवापाडे ।
दुःख पर्वताएवढे ।।
जवाएवढे सुख मिळविण्यासाठी पर्वताएवढे दुःख पचविण्याची तयारी ठेवावी लागते. देवांना मिळालेले देवत्व हे त्यांनी पचवलेल्या क्लेशाचीच परिणती आहे. प्रभू श्रीरामांना वनवास भोगावा लागला, भगवान शंकरांना हलाहल पचवावे लागले. संतांना कायमच लोकनिंदेला सामोरे जावे लागले. आजही सत्य, प्रामाणिकपणा, सात्विकपणा कायम ठेवून जीवन जगणाऱ्याच्या वाट्याला अवहेलना येते. मोठे पण मिळते ते यातना सोसूनच. संतवचनच आहे-
जया अंगी मोठेपण।
तया यातना कठीण।।
आता हे सर्व आहे म्हणून शाश्वत मूल्यांचा मार्ग, जीवन पद्धती सोडून द्यायची, असा अर्थ होत नाही. तर कुठलीही अवस्था अथवा परिस्थिती सारखीच राहते असे नाही. ती बदलते पण तोपर्यंत आपण धैर्याने, आत्मविश्वासाने आत्मिक पाठबळावर वाटचाल सुरूच ठेवावी. संतांनी सांगितल्याप्रमाणे आपला विश्वास कायम ठेवावा.
परमेश्वर चरणी अनन्य भाव, निष्ठा, कायम ठेवून सत्यमार्गाने आचरण सुरूच ठेवावे. कठीण यातनेशिवाय मोठे पण नाही. दगडाने घाव सोसल्यावरच मूर्ती साकार होते. दुःखानंतर सुख हा आशावाद कायम ठेवावा. जेणेकरून कठीण प्रसंगात आपला आत्मविश्वास डळमळणार नाही.
प्रा. नितीन मटकरी