जीवलगांची प्रत्येक वेळी भेट घडून येतेच असे नाही. मग अशा वेळी मन काहीसं उदास होतं; परंतु “स्मरण हीच भेट’ असते हे आपण विसरतो.
शीर्षक वाचून आश्चर्य वाटेलं ना? पण गजानन महाराजांच्या पोथीतील वरील पंक्तीचा अर्थ खूप छान दिलेला आहे. एका अध्यायात महाराज स्वत: म्हणतात. प्रत्यक्ष भेट नाही झाली, तरी ज्या व्यक्तींची आपण आठवण काढली, स्मरण केले तरी त्यांची भेट झाल्याचा अनुभव आपल्याला येतो. किती सुंदर कल्पना आहे! माझ्या मनाला तिच्या अर्थासहीत ती भिडली. आज आपण कोणाची भेट झाली नाही तर हळहळतो. कोणी आपल्या भेटीच्या अगोदरच लांबच्या प्रवासाला निघून गेले, तर शेवटची भेट झाली नाही याची खंत बाळगतो. शेवटची भेट झाली नाही याचेही दु:ख करीत राहतो. मग आधीच्या सहवासाचा, भेटींचा हिशेब मनात ठेवीत राहतो. मग का बरं आपण स्मरणातून त्या व्यक्तींना भेटण्याचा प्रयत्न करीत नाही. म्हणून मला “स्मरण हीच भेट’ हे महाराजांनी म्हटलेलं मनाला एकदम पटून गेलं. या शब्दांच्या मागे अर्थांसाठी धावताना आणखी निरनिराळे संदर्भ आठवत गेले. असं म्हणूया निरनिराळ्या व्यक्तींची भेट होत गेली. आठवणींची गावं मनाच्या हिंदोळ्यांवर मनाला बसवून शांतवत गेली. वेगवेगळ्या कल्पना वेगवेगळे अर्थ उलगडत गेली. शेवटी खरंय. स्मरण हीच भेट!
आज यंत्रयुगात अत्याधुनिक यंत्रणा आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. मोबाइल फोनमुळे तर जग अगदी जवळ आलंय. क्षणात आपण परदेशी व्यक्तीशी थेट संपर्क साधू शकतो. व्हिडिओ कॉलने एकमेकांना भेटू शकतो. सर्वकाही ऑनलाइन. जग सुधारलंय नक्कीच. पण यासाठी बराच कलावधी जावा लागला. तेव्हा कुठे आजचा हा दिवस आपल्याला बघायला मिळाला.
मध्यंतरीच्या काळात करोनामुळे बराच उत्पात झाला. माणसं दुरावली, काही कायमची पडद्याआड गेली. त्यावेळी या यंत्रयुगातील मशिनींमुळे बरीच सोय झाली. करोना रुग्ण एकांतात एकाकी असला तरी मोबाइल फोनचा सहारा होता. घरच्यांशी संबंध ठेवून होता. भेट नाही झाली तरी फोनवरून बोलणं-दिसणं सहजशक्य होतं. अगदी जरी नाही तरी काही प्रमाणात या तंत्रज्ञानाचा फायदा आपल्याला होताना दिसतो.
अलीकडेच माझा भाऊ आणि वहिनी कॅनडाला गेले. त्यांच्या नातीला पाहायला. करोनामुळे मुलीच्या बाळंतपणात जाताच नाही आले. नात आता वर्षाची व्हायला आलेली. पण जन्मल्यापासून समज जशी येत गेली तेव्हापासून तिला आजी-आजोबांशी व्हिडिओवरून बोलणे केलं जात असे. असा हा कार्यक्रम ठराविक वेळात रोज रोज होत असे. आश्चर्य म्हणजे, ज्यावेळी भाऊ आणि वहिनी तिकडे गेले आणि तिच्या प्रत्यक्ष भेटीआधी आजी-आजोबा तिला व्हिडिओवर दाखविण्यात आले आणि त्यानंतर प्रत्यक्ष जेव्हा तिने त्या दोघांना पाहिले तेव्हा आनंदाने झेप घेत ती त्यांच्याजवळ गेली. ही सारी किमया मोबाइलमुळे झाली. असो थोडे विषयांतर झाले.
स्मरण हीच भेट, असा संकेत आपल्या कविजनांनी, कलाकारांनी फार सुंदर पद्धतीने उचलून धरलेला आहे. आजवर किती तरी काव्ये, भावगीते यावर रचली गेलेली आहेत. उषा+अनिरूद्ध यांचे प्रेम असेच स्वप्नात एकमेकांना पाहून फलद्रूप झाले. अनिरूद्ध श्रीकृष्णाचा नातू. त्याच्या स्वप्नात एक सुंदर राजकन्या नेहमी यायची. स्मरणात ती राहून गेलेली होती. दिवसरात्र एकमेकांना स्मरणात भेटून ते आपले प्रेम व्यक्त करीत गेले. जेव्हा प्रथम त्यांनी प्रत्यक्षात एकमेकांना पाहिले तेव्हा ते चिरपरिचित होते.
स्मरण ही देवाने आपल्याला दिलेली एक अनमोल भेट आहे. तिचा योग्य तो आदर आपण करावयास पाहिजे. आपल्या परिचयातील, अतीव प्रेमातील लोक आपल्या स्मरणात कायम वस्तीला असतात. मनातून काढू म्हटलं तरी काढली जात नाहीत. मग हवं तेव्हा आपण त्यांना भेटू शकतो. या भेटी अबोल असतात. शब्दांचे चढउतार नसतात. शांतता असते. अनेक अर्थांनी हे मौन बोलके असते. ही मौनाची भाषा या हृदयीचे त्या हृदयी अशी असते आणि हीच भेट म्हणजे स्मरणभेट अविस्मरणीय असते.
फार दूर जायची गरज नाही. आपली संतमंडळी याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांना जागेपणी, निद्रिस्त असताना कायम परमेश्वराचे स्मरण असे. देहभान विसरून ते ईश्वरचरणी लीन होते. त्यांच्या स्मरणात त्यांचा देव कायम वस्तीला असे. बाह्य जगाचा विसर पडून ते कायम आपल्यातच मग्न असत. त्यांच्या त्या भावावस्थेत कितीतरी महान काव्यांची निर्मिती झाली. त्यातील उत्कटता आजही मनाला मोह घालते. इतरजनांना त्यावेळी संतांचा वेडेपणा वाटला. प्रत्यक्ष गजानन महाराजांना लोकांनी खुळा म्हटलेलं होतं. पण त्यांच्यातील देवत्व ज्यांनी ओळखले ते त्यांचे भक्त झाले. हे सारे आजही आपल्या स्मरणात आहे. मग असे म्हणू शकतो ना आपण पण स्मरण हीच भेट. शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले… प्रीती भक्ती ही अशीच असते. एकाच नात्याच्या दोन बाजू!
स्मरण म्हणजे स्मृती, आठवण, याद, वेगवेगळ्या भाषेत याला वेगवेगळी नावे आहेत. नित्यस्मरण म्हणजे कायम आठवण. आपल्याकडील चित्रपटांची अनेक गीतं या स्मरणावर आधारित आहे. अनेक प्रेमवीर केवळ प्रियेच्या आठवणीवर दिवस काढताना दिसतात. मग त्यांना भास होतात. अशी स्वप्नरहस्ये बऱ्याच चित्रपटात रेखाटलेली आहेत आणि त्यावरील गाणी प्रसिद्ध आहेत. अजरामर झालेली आहेत.
आजही स्मरण हे तेवढेच महत्त्वाचे आहे. कधीतरी आपल्याच मनाशी स्मरणशक्तीचे खेळ खेळावे.
अगदी ज्या वयात आपण आहोत, त्या वयापासून अगदी लहान वयात किंवा बालवयातल्या आठवणी आजही स्मरणात आहेत असे लक्षात येते. त्या काळातील काही ठळक व्यक्तींचेही, घटनांचे स्मरण आजही आहे आणि मग सहजच असे म्हटले जाते की आठवणी काढल्या की, ती सारी माणसं डोळ्यासमोर उभी राहतात आणि पुनर्भेटीचा आनंद मनात दाटून येतो. म्हणूनच मग महाराजांच्या पोथीतील एका अध्यायातील ओळ “स्मरण हेच भेट’ प्रत्ययाला येते. खरंच मानवी जीवन हाही एक स्मरण ग्रंथच आहे.
अरुणा सरनाईक