तळेगावातील सभेने मोडले आजपर्यंतच्या गर्दीचे विक्रम
तळेगाव – मावळचा निकाल सांगण्यासाठी आता ज्योतिषाची गरज नाही. तुमचा उत्साह, उपस्थिती हे सगळं स्पष्ट सांगतोय. मावळच्या हिताची जपणूक करण्यासाठी, आक्रमक रीतीने विकास करण्याची ताकदत ज्याच्या मनामध्ये आहे, त्या सुनील शेळके यांना संधी द्या, पाठिंबा द्या, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस-एसआरपी व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी तळेगाव येथे शरद पवारांची सभा आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. या सभेने आजपर्यंतच्या तळेगावात झालेल्या सर्व सभांच्या गर्दीचे विक्रम मोडीत काढले. शरद पवार यांनी यावेळी आपल्या मिश्किल शैलीत चौफेर फटकेबाजी केली. भाजप सरकारच्या नाकर्तेपणाचा खरपूस समाचार घेतला. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे, मावळ तालुका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम साखर कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष नानासाहेब नवले, उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मावळ तालुका कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात शरद पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातील 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर केंद्र सरकारने 81 हजार कोटींची रक्कम सरकारी तिजोरीत भरली. धनदांडग्यांच्या कर्जाचे ओझे माफ केले, पण शेतकऱ्यांसाठी काही केले नाही. शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम राष्ट्रवादीने केले. शेतकऱ्यांची बिकट अवस्था या नाकर्त्या सरकारच्या लक्षात कशी येत नाही? असा संतप्त सवालही पवार यांनी यावेळी केला. महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलायचा आहे, त्यासाठी सुनील शेळके यांच्यासारख्या तडफदार तरुणाला आमदार केले पाहिजे, असे पवार म्हणाले. तळेगावात शरद पवारांच्या सभेला झालेली अभूतपूर्व गर्दी ही मावळमधील राजकीय समीकरणे बदलण्याची नांदी ठरल्याची चर्चा सभास्थळी रंगली होती.
14 रस्ते तरी केले का? – शेळके
उमेदवार सुनील शेळके यांनी विद्यमान आमदारांवर खरपूस टीका केली. ते म्हणाले की, मावळ गोळीबारप्रकरणात निष्पाप लोकांचा बळी गेला. तालुक्यातून मोठमोठ्या कंपन्यांचे स्थलांतर झाले. 10 वर्षे इथल्या आमदारांनी कामे केली असती, तर ही जनता आज माझ्या पाठीशी उभी राहिली नसती. 14 हजार कोटी आणल्याच्या वल्गना करणाऱ्यांनी 14 रस्ते तरी चांगले आहेत का? याचे उत्तर द्यावे. माय-भगिनींची फसवणूक लावली आहे. त्यांना सक्षम करण्यासाठी काय केले? तरुणांच्या हाताला काम नाही. मावळवासीयांनी मला संधी दिल्यास 25 हजार तरुणांना रोजगार देऊ, 5 वर्षांत मावळ तालुका खड्डेमुक्त करून दाखवू, अशी ग्वाहीही शेळके यांनी दिली.