नवी दिल्ली – स्टेट बॅंक ऑफ इंडियाने त्यांचे 76 हजार कोटी रूपयांचे बुडित कर्ज माफ केले आहे. त्याची बातमी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. त्या अनुषंगाने सरकारने नेमक्या कोणाचे हे कर्ज माफ केले त्यांची नावे जाहीर करावीत असा मुद्दा कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला आहे.
ज्यांच्याकडे शंभर कोटींपेक्षा अधिक रकमेची थकबाकी आहे अशा 220 लोकांचे कर्ज मोदी सरकारने माफ केले आहे हे नेमके कोण लोक आहेत असा सवाल प्रियांकांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांना तुरूंगात डांबले जात आहे, अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, लोकांना नोकरीवरून काढले जात आहे, बॅंकांबुडाल्यामुळे ज्यांचे पैसे डुबले आहेत असे खातेदार रडकुंडीला आले आहेत.
असे असताना मोदी सरकार 76 हजार रूपयांची कर्ज माफी नेमकी कोणाला देते आहे, या 220 जणांनाच रेडकार्पेट वागणूक का दिली जात आहे असे प्रश्न प्रियांका गांधी यांनी उपस्थित केले आहेत.