PM Narendra Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकच्या दिंडोरीमध्ये आज (दि. १५) प्रचार सभा पार पडली. दिंडोरीत महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार आणि नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी मोदींची सभा झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि नागरिक मोदींचे भाषण ऐकण्यासाठी उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय शिवाजीच्या घोषणा देत भाषणाला सुरुवात केली. सप्तशृंगी मातेला आणि नाशिकच्या प्रभू श्रीराम चंद्राला नमन करतो, असे त्यांनी म्हटले. काल काशीत बाबा विश्वनाथ आणि काल भैरवाचा आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. आज त्र्यंबकेश्वर, नाशिकच्या धर्तीवर आलोय.
तुमची सेवा हेच माझ्या आयुष्यातील ध्येय आहे. तुम्ही मागील 10 वर्षात माझे काम पाहिले आहे. मी आज तुमच्याकडे तिसऱ्या टर्मसाठी आशीर्वाद मागण्यास आलोय. असं ते म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ‘ही नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी पार्टी यांचं काँग्रेसमध्ये विलय होणार आहे. जेव्हा या नकली शिवसेनेत विलय होईल. तेव्हा मला सर्वाधिक आठवण बाळासाहेब ठाकरे यांची येणार.
कारण बाळासाहेब म्हणायचे, शिवसेना काँग्रेस बनल्याचं कळलं तेव्हा शिवसेना बंद करेल. म्हणजे नकली शिवसेनेचा आतापत्ताही राहणार नाही. मला वाटतंय हा विनाश होत आहे, त्याने बाळासाहेब दुखी होत असतील. नकली शिवसेनेने बाळासाहेबांच्या प्रत्येक स्वप्नांना उद्धवस्त केलं आहे.’ अशा खोचक शब्दांत नरेंद्र मोदी यांनी टीका केली.
ते पुढे म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं अयोध्येत राम मंदिर उभं राहावं. बाळासाहेबांचं स्वप्न होतं, जम्मू काश्मीरमधून आर्टिकल ३७३ रद्द व्हावं. हे स्वप्न पूर्ण झालं. पण याची चीड नकली शिवसेनेला येत आहे. काँग्रेसने प्राणप्रतिष्ठेच्या निमंत्रणाला ठोकर मारली. नकली शिवसेनेनेही तोच मार्ग निवडला’. असं देखील पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.