नवी दिल्ली – पीएमएल-एन पक्षाचे सर्वेसर्वा नवाझ शरीफ यांनी पंतप्रधानपदासाठी धाकटे बंधू शेहबाझ शरीफ यांचे नाव पुढे केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे नवाझ शरीफ यांची राजकीय कारकिर्दच संपुष्टात आल्याची चचर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. जर सर्वकाही नियोजनानुसार पार पडले तर पीएमएल-एन पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीचे सरकार पुढील महिन्यात सत्तेवर येऊ शकते.
निवडणुकीनंतरच्या आघाडीच्या जुळवाजुळवीमध्ये शेहबाझ शरीफ यांनीच पुढाकार घेतला होता. त्यामुळे त्यांच्याच नावाची चर्चा होत होती. नवाझ लंडनवरून मायदेशी परत आल्यावर ते पुन्हा पंतप्रधान होतील, असे जरी म्हटले गेले असले, तरी शेहबाझ यांनी थोरल्या बंधूंना वेळीच रोखले आणि स्वतःची पक्षावरील पकड घट्ट केली आहे. लष्कराचा पाठिंबा नवाझ यांच्यापेक्षा आपल्याला मिळवण्यात ते यशस्वी झाले.
परदेशातून परतलेल्या नवाझ यांचे लष्कराने स्वागत केले असले तरी नवाझ यांच्यापेक्षा शेहबाझ यांच्याबरोबर काम करण्याला पाकिस्तानमधील लष्कराने अनुकूलता दाखवली आहे. मात्र यामुळे नवाझ शरीफ यांची राजकीय कारकिर्द संपुष्टात आल्याची शक्यता नवाझ यांच्या कन्या मरियम नवाझ यांनी फेटाळून लावली आहे.
नवाझ यांनाच पंतप्रधान बनायचे होते. मात्र खंडीत जनादेश मिळाल्यामुळे त्यांनी हा विचार सोडून दिला, असे मरियम सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हणाल्या. नवाझ यांनी राजकारण सोडून देण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. पंजाब आणि राष्ट्रीय सरकारमधील मोठी भूमिका ते पार पाडणार आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
नवाझ शरीफ यापूर्वी तीन वेळा पंतप्रधान राहिले होते. तेंव्हा त्यांना संसदेत बहुमत मिळाले होते. मात्र आता पीएमएल-एन पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. नवाझ शरीफ यांना आघाडी सरकारचे नेतृत्व करण्यात काहीही स्वारस्य नाही. शेहबाझ आणि आपण स्वतः (मरियम) नवाझ यांचे शिलेदार आहोत. त्यांच्या आज्ञेचे पालन करण्यास कटिबद्ध आहोत. त्यांच्या आदेशांनुसार काम करणार आहोत, असेही मरियम म्हणाल्या.
मात्र शेहबाझ यांचे नाव घोषित केल्यावर पक्षातील मतभिन्नता उघड झाली. नवाझ यांनीच पंतप्रधान बनायला हवे होते, असे पक्षातील काही नेते म्हणाले. निवडणुकीच्या काळातही नवाझ यांनाच डोळ्यासमोर ठेवून प्रचार केला गेला होता. मात्र शेहबाझ यांचे नाव जाहीर झाल्यामुळे पक्षाच्या अनेक नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. नवाझ हेच पंतप्रधान बनावेत अशी अपेक्षा व्यक्त करणारी तब्बल ९० हजार ट्विट पोस्ट झाली आहेत. त्यासाठी हॅशटॅग गिव्ह पाकिस्तान नवाझ हे अभियानही सोशल मीडियावर चालवले गेले.
तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीच खंडीत बहुमतामुळे नवाझ शरीफ यांना माघार घेण्यास भाग पाडले असल्याचीही चर्चा आहे.
काहीही असले तरी आता पंतप्रधान शेहबाझ शरीफ होणार म्हणजे नवाझ शरीफ यांना पडद्यामागेच रहावे लागणार आहे. नाही म्हटले तरी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला आणखीन एक ब्रेक लागणार आहे. ही त्यांच्या कारकिर्दीच्या समाप्तीची लक्षणे असू शकतात.