मुंबई – सिनेकलाकार अनुराग कश्यप (Anurag Kashyap), तापसी पन्नू (Tapsee Pannu) यांच्या घरी आणि त्यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. जे लोक केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका मांडतात वा सरकार विरोधात आवाज उठवतात त्यांच्यावर ईडी, सीबीआय, आयकर विभाग छापे (Income Tax Raids) टाकते असे वारंवार दिसून आले आहे, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनुराग कश्यप, तापसी पन्नू हे केंद्र सरकारच्या कामाबाबत टिप्पणी करत होते. त्यांचा आवाज दाबण्यासाठी याप्रकारची कारवाई करण्यात आली आहे. हे काही नवीन नाही. जे लोक सरकार विरोधात बोलतात त्यांच्यावर असा दबाव टाकण्यात येतो, याचे हे ताजे उदाहरण आजच्या घटनेतून समोर आले असल्याची टीका देखील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री ‘तापसी पन्नू’ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप, तसेच ‘क्वीन’ चित्रपटाचा निर्माता विकास बेहेल यांच्या घरावर आणि मालमत्तांवर आज (दि.3) प्राप्तिकर विभागानं धाड टाकली आहे. सध्या पुणे आणि मुंबईत तब्ब्ल 22 ठिकाणांवर हे धाडसत्र सुरु आहे.
कलाकारांच्या घरावर अचानक पडलेल्या या धाडीने बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई 2015 मध्ये आलेल्या फँटम चित्रपटाशी संबंधित असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आता या छापासत्रातून अनेक मोठी नावं पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.