Eva Abdullah: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर मालदीवच्या सौदर्याची जगाने अनुभूती मिळाली. मात्र हे सुरु असताना मालदीवच्या तीन मंत्र्यांनी त्यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर भारतीयांनी ‘बायकॉट मालदीव’ हा ट्रेंड सुरू केला. दरम्यान, आता मालदीवच्या खासदार इवा अब्दुल्ला यांनी झालेल्या प्रकारावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मंत्र्यांनी केलेली विधानं ‘लाजिरवाणे आणि वर्णद्वेषी’ असल्याचे म्हणत मंत्र्यांचा समाचार घेतला.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना, इवा अब्दुल्ला म्हणल्या, “मंत्र्यांनी केलेल्या विधानांवर भारतीयांचा संताप समजू शकते. मंत्र्यांनी केलेली विधान संतापजनक आहेत. पण, मंत्र्यांनी केलेल्या लाजिरवाण्या वक्तव्याप्रकरणी मी भारतीय नागरिकांची माफी मागते.”तसेच, माफी मागत मालदीवरील बहिष्कार मोहीम संपवण्याची विनंती इवा अब्दुल्ला यांनी भारतीयांना केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले होते. यानंतर भारतीय नागरिकांकडून लक्षद्वीपच्या पर्यटनाबाबत कौतुक केले जात होते. मालदीवला जाण्यासाठी लाखो रूपये खर्च करण्यापेक्षा लक्षद्वीपला जाणं चांगलं, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटली. यानंतर संतप्त झालेल्या सत्ताधारी प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीवच्या (पीपीएम) मंत्री मरियम शिउना, मंत्री अब्दुल्ल महजूम माजिद आणि मंत्री मालशा शरीफ यांनी पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती.
दरम्यान, सदर प्रकरणाबाबत मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी याप्रकरणाबाबत भारताशी चर्चा करून आपली बाजू मांडावी. सरकार या विधनाशी सहमत नसल्याचं स्पष्ट करावे. मालदीवमध्ये आदरातिथ्य, शांतता, सहिष्णुतेच्या मुद्द्यावर पर्यटन व्यवसाय विकसित झाला आहे. भारतासह जगभरातीय अनेक कंपन्यांनी मालदीवमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे झालेला हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे,” असे मोहम्मद नशीद यांनी म्हटले.