नवी दिल्ली: आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी नौदलाकडून तीन युद्धनौका तयार ठेवल्या जात आहेत. आयएनएस-जलश्व आणि दोन मगर श्रेणीच्या उभयचर युद्धनौका आवश्यकता भासल्यास या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी पाठवून देण्यात येणार आहेत, असे सरकारी सूत्रांनी बुधवारी सांगितले.
आयएनएस जलश्व ही विशाखापट्टणम तळाबाहेर आहे. तर मगर श्रेणीच्या युद्धनौका नौदलाच्या दक्षिण विभागाच्या कोची स्थित तळावर तैनात आहेत. या युद्धनौका प्रवासास जाण्यास तयार असून आदेश मिळाल्यानंतर त्या मार्गस्थ होतील, असेही सूत्रांनी सांगितले.
कोविड-19 चा प्रादुर्भाव अजूनही सुरुच असल्याने आखाती देशातील भारतीयांना मायदेशी आणण्यसाठी नौदलाची जहाजे आणि हवाई दलाच्या विमानांना तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतची सविस्तर योजना सरकारला पूर्वीच सादर करण्यात आली आहे. नौदलाच्या 3 युद्धनौकांमधून 1,500 नागरिकांची सुटका केली जाऊ शकेल, असे नौदलाने म्हटले आहे.