मुंबई -हनुमान चालिसावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. मुंबईत आमदार रवी राणा आणि त्यांच्या खासदार पत्नी नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती, तेव्हापासून राणा दांपत्य शिवसेनेच्या निशाण्यावर आले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणा दांपत्याचे नाव बंटी बबली ठेवले आहे. राणा यांच्या आव्हानानंतर शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वैदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शनिवारी सकाळपासूनच राणा यांच्या खारच्या घराबाहेर शिवसैनिकांनी तळ ठोकला आहे. त्यामुळे राणा दांपत्य बाहेर पडू शकले नाही. नवनीत राणा यांनी सकाळी नऊ वाजता मातोश्रीवर जाणार असल्याचे सांगितले होते, मात्र ते जाण्यापूर्वीच मोठ्या संख्येने शिवसैनिक येथे पोहोचले. यावेळी शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या प्रियांका चतुर्वेदीही येथे पोहोचल्या होत्या.
नवनीत राणा यांच्या चॅलेंजला प्रियंका चतुर्वैदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या हनुमान चालीसेला शिवसेनेचा विरोध नाही. ढोंगी हनुमान भक्तांची अडचण असून त्यांना विरोध केला जात आहे. राणे दांपत्य घराबाहेर पडेपर्यंत आम्ही येथेच बसून राहणार आहे. आम्ही त्यांचे स्वागत करू. एका शिवसैनिकाने सांगितले हनुमान चालिसानंतर प्रसाद देण्याची प्रथा आहे, आम्ही त्यांना प्रसाद देऊ.
प्रियंका पुढे म्हणाल्या आम्ही राणा दांपत्याला मोठा वडा पाव खाऊ घालू. कोल्हापूरी मिर्चीसह त्यांचे स्वागत करणार आहे. त्यांनी घराबाहेर पडावे आम्ही राणा यांचे खुले आव्हान स्वीकारले आहे. मुंबई पोलीस आपले काम करत आहेत. राणा दांपत्य बाहेर आले नाही तर हे सिद्ध होईल की बनावट कार्ड बनवून निवडणुका जिंकतात आणि बनावट हनुमान भक्ती दाखवतात. राणा दांपत्य बाहेर या, आम्ही त्यांना रस्ता दाखवू. असे जोरदार प्रत्युत्तर प्रियंका यांनी नवनीत राणा यांना दिले आहे.