नवी दिल्ली – कॉंग्रेसचे पंजाबातील नेते नवज्योत सिद्धु यांनी मागची सर्व नाराजी दूर सारून पक्षाच्या आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी स्वताला झोकून देण्याचे संकेत दिले आहेत.
त्यासाठी त्यांनी तेरा कलमी कार्यक्रम तयार केला आहे. या कार्यक्रमाची माहिती त्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र पाठवून दिली असून त्यांनी त्यासाठी सोनियांशी चर्चेची वेळही मागितली आहे. त्यांनी नुकतीच पक्षाचे नेते राहुल गांधी आणि के. सी. वेणुगोपाल यांचीही भेट घेतली आणि त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा दिलेला राजीनामाही मागे घेतला आहे.
पक्षातील मतभेदाचे सर्व मुद्दे दूर झाले असून आपण हा राजीनामा मागे घेतला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी पक्षाच्या निवडणुकीसाठी जो तेरा कलमी कार्यक्रम तयार केला आहे त्याची माहितीही त्यांनी सोशल मिडीयात प्रकाशित केली आहे.
या कार्यक्रमात प्रामुख्याने पंजाबातील वाढती व्यसनाधिनता, रोजगाराच्या संधी, शेतकऱ्यांचे प्रश्न, मागासवर्गीयांची उन्नती, राज्यातील वाळू खनिजाशी संबंधीत प्रश्न इत्यादींबाबत करायच्या कामाची माहिती दिली आहे.