मुंबई : पंजाबच्या राजकारणात वादळ निर्माण करत तसेच काँग्रेसमधून बाहेर पडत स्वतःचा पक्ष काढून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाशी हात मिळवणी करणाऱ्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचे पंजाब अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर निशाणा साधला आहे. नवज्योत सिंग सिद्धू असंतुलित असून त्यांना डोक्याचा भाग नाही, असे मत अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केले आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग यावेळी बोलताना म्हणाले, “मला नवज्योत सिंग सिद्धूंवर बोलायचं नाही. कारण मी त्यांना कायम असंतुलितच म्हटलं आहे. मी पहिल्या दिवसापासून या माणसाकडे डोक्याचा भाग नाही असंच म्हटलं आहे. त्यांना केवळ वेळ वाया घालवायचं माहिती आहे.”
“मला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नवज्योत सिंग सिद्धू काँग्रेससाठी योग्य आहेत का याविषयी माहिती काढण्यास सांगितलं होतं. तेव्हा मी सिद्धू काँग्रेसचा सदस्य बनण्याच्या लायक नाही असे सांगितले होते. काँग्रेसने ते ऐकलं नाही, तो त्यांचा निर्णय आहे. त्यांना याचा अनुभव येईल,” असे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सांगितले.
सिद्धूसोबतच्या एका बैठकीचा उल्लेख करत अमरिंदर सिंग म्हणाले, “आम्ही दोघ दिल्लीतील इंपिरिअल हॉटेलमध्ये भेटलो. मी सिद्धूंसोबत चर्चा सुरू केली तेव्हा पहिल्यांदा त्यांनी एक शिवलिंग समोर ठेवलं. मी हे कशासाठी विचारलं तर ते म्हटले ही माझी सवय आहे. आम्ही बराच वेळी चर्चा केली. सिद्धूंनी सांगितलं की ते रोज ६ तास ध्यानधारणा (मेडिटेशन) करतात. ध्यान करताना काय करता असं विचारलं तर ते सिद्धूंनी देवासोबत बोलतो असं सांगितलं.”
“मी विचारलं देवासोबत काय बोलता? असं विचारल्यावर सिद्धू म्हणाले तुमच्यासोबत जसं बोलतो तसंच देवासोबत बोलतो. बऱ्याच दिवसांपासून पाऊस पडला नाही, पाऊस कधी पाडणार असे मी देवाला विचारत असल्याचे सिद्धूंनी सांगितले. हे ऐकून मी सोनिया गांधींना हा माणूस ‘दिवाना’ असल्याचे सांगितले,” अशी माहिती कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिली.