राजगुरूनगर/शिंदे वासुली -निसर्ग चक्रीवादळामुळे खेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वहागाव येथील एकाच कुटुंबातील दोघांचा बळी गेला आहे. जिल्हा परिषदेच्या 18 शाळा, 18 पेक्षा जास्त अंगणवाड्या आणि 2500 पेक्षा अधिक घरे, मंदिर, स्मशानभूमी, जनावरांचा गोठा आदींचे छत उडुन नुकसान झाले. दरम्यान, मयत व्यक्तींना प्रत्येकी चार लाख रुपये तातडीची मदत शासनाकडून देण्यात येणार असून शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 25 हजरांची मदत दिली आहे.
वहागाव येथील तानाजी अनंता नवले यांच्या घराची भिंत बुधवारी (दि. 3) कोसळल्याने तीन जण गंभीर जखमी झाले होत. त्यापैकी मंजाबाई अनंता नवले (वय 65) यांचा बुधवारीच तर त्यांचा मुलगा नारायण अनंता नवले (वय 38) यांचा गुरुवारी (दि. 4) पहाटे उपचारादम्यान मृत्यू झाला आहे. तर तानाजी अनंता नवले हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर शिवे आणि वहागाव या दोन गावात सर्वाधिक नुकसान झाले आहे वहागाव परिसरात गुरुवारी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, खेड बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, माजी सभापती अरुण चांभारे, ऍड. सुखदेव पानसरे, पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, भगवान पोखरकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवाजी वर्पे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, माजी तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, रोहिदास गडदे, गटविकास अधिकारी अजय जोशी, आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे यावेळी उपस्थित होते.
विद्युत खांब उन्मळून पडले
खेड तालुक्यातील 200 पेक्षा अधिक विद्युत खांब उन्मळून पडले आहेत. अनेक झाडे जमीनदोस्त झाली. जोरदार वाऱ्याने आंब्याच्या सर्व कैऱ्या, आंब्याचा सडा जमिनीवर पडला होता. उन्हाळी बाजरी भुईसपाट झाली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागणार आहे.
वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करा- आमदार मोहिते
खेड तालुक्यातील नुकसानीची पाहणी व पंचनामे करून नुकसाट्ग्रस्तांना शासनाने तात्काळ भरीव मदत करावी. तालुक्यातील खंडित वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा अशी मागणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी नावलकिशोर राम यांच्याकडे केली. आमदार मोहिते पाटील यांनी डेहणे परीसरात पाहणी केल्याचे बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांनी सांगितले.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना जास्तीत जास्त आर्थिक साहाय्य मिळावे अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याशी मोबाइलवर बोलून केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही मदत तातडीने मिळविण्यासाठी आग्रह धरला आहे. याशिवाय वहागाव येथील नवले कुटुंबातील मृत दोघांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत देण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी चर्चा केली आहे. ही शासकीय मदत देखील या कुटुंबातील वारसांना तात्काळ मिळवून देऊ.
– शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार