सोरतापवाडी -परिसरातील जवळजवळ तीस हेक्टरच्या पुढे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. 17 पॉलीहाउस, पत्रा शेड आदीचे नुकसान झाले आहे. सोरतापवाडी परिसरात तलाठी राम कारंडे व कृषी अधिकारी महेश सुरडकर यांनी तातडीने सर्व पंचनामे करून शासनाकडे पाठविले आहेत. तर शेतकरी आता भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.
पुणे जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. सोरतापवाडी परिसरातील उरुळी कांचन, नायगाव, पेठ, कोरेगाव मुळ, खामगावटेक, टिळेकर वाडी, शिंदवणे आदी गावांतील शेतीचे नुकसान कमी जास्त प्रमाणात झाले असल्याची माहिती मंडळ अधिकारी दीपक चव्हाण यांनी दिली.
निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यात नुकसान झालेल्यांचे पंचनामे करून ताबडतोब शासनाकडे पाठविण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यात पाहणी करून नुकसानीचा अहवाल ताबडतोब सादर करण्यास सांगितला होता. शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी उरुळी कांचन परिसरात पाहणी करून झालेल्या नुकसानचे भरपाई मिळेल असे सांगितले.
शेती पिकांचे, शेडनेट, पॉलीहाउस, जनावरांच्या गोठ्यांचे, कुक्कुटपालन शेडचे नुकसान झाले. पिकांसह, झाडे केळीच्या बागा व घरांना फटका बसला. परिसराला वादळ, पावसाने झोडपून काढले. वादळामुळे विजेचे खांब, घरावरील पत्रे तसेच उभी असलेली पिके आडवी झाली. टोमॅटोसह वेलवर्गीय पिके, ऊस, केळी आदींचे मोठे नुकसान झाले.