चंद्रराव तावरे यांची टीका ः सहकारी कारखानदारी मोडीत काढल्याचा आरोप
बारामती -माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खालच्या पातळीवर जाऊन भाषणबाजी करीत आहेत. कारखान्याच्या निवडणुकीत त्यांचा संयम सुटत चालला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ चंद्रराव तावरे यांनी पवार यांच्यावर घणाघात केला आहे.
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावच्या कार्यक्षेत्रात प्रचार सभा घेतल्या. यावेळी त्यांनी सत्ताधारी मंडळींवर टीकेची झोड उठवली. त्याला तावरे यांनी प्रत्युत्तर दिले. खासगी साखर कारखानदारीच्या माध्यमातून राजा व्यापारी झाला असून प्रजा भिकारी होत आहे. सहकारी संस्थांचा उद्देश सोडून त्याच्यामध्ये राजकारण येऊ लागले.
ज्या सहकारी संस्था ताब्यात घेतल्या त्यांची वाट लावली, अशी जाहीर टीका करत तावरे यांनी थेऊर, भीमा पाटस व छत्रपती सहकारी साखर कारखाना मोडीत निघाल्याचे उदाहरण दिले. राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी माळेगावच्या आखाड्यात कार्यकर्त्यांचा फौजफाटा गोळा केला आहे, असे असले तरी शेतकऱ्यांच्या मुलांनी बनवलेले सहकार बचाव पॅनल आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी याबाबत योग्य निर्णय घेतील असेही तावरे यांनी स्पष्ट केले.
दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ द्या
माळेगावच्या विस्तारवाढीची चौकशी केव्हाही करा, पण त्याबरोबरच सोमेश्वर व छत्रपती कारखान्याची देखील चौकशी करा एकदा दूध का दूध व पानी का पानी होऊन जाऊ दे, अशा शब्दांत माळेगाव कारखान्याचे चेअरमन रंजन तावरे यांनी अजित पवारांना आव्हान दिले. सोमेश्वरला माळेगावपेक्षा जास्त साखर उतारा आहे. मग सोमेश्वरचा दर माळेगाव पेक्षा कमी का? असा सवालही तावरे यांनी उपस्थित केला आहे.
साखर कारखाने मोडीत काढले
राज्य सहकारी बॅंकेच्या माध्यमातून नेतेमंडळींनी सहकारी साखर कारखाने मोडीत काढले. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे मात्र तसे होऊ देणार नाही, असा विश्वास रंजन तावरे यांनी व्यक्त केला. 11.96 साखर उताऱ्याला राज्यात उच्चांकी भाव माळेगाव कारखान्याने दिला आहे. इतर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासद नेतेमंडळींना याचा जाब विचारू लागले आहेत. साखर उताऱ्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. माळेगाव कारखान्याचे विस्तार वाढ 1 कोटी 95 लाख रुपयांत झाली. तर सोमेश्वरच्या विस्तार वाढीसाठी तब्बल 5 कोटी 2 लाख खर्च केले.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची 2020ची निवडणूक उच्चांकी दराने गाजली. आगामी काळात येणारी 2025ची निवडणूक देखील देशात नंबर एकच्या उच्चांकी दरावर आधारित असेल. राज्यात उच्चांकी भाव देण्याचा विक्रम माळेगाव कारखान्याने केला आहे. साखर धंद्यातील गुजरात पॅटर्न माळेगावच्या कारखान्यात राबविण्यात येणार आहे. त्यामुळे उच्चांकी दरात राज्यात अव्वल असलेला कारखाना देशातही अव्वल करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे 2025 ची निवडणूक देखील देशातील उच्चांकी दरावर आधारित असेल.
-रंजन तावरे, चेअरमन माळेगाव सहकारी साखर कारखाना