मुंबई – शरद पवारांच्या सभेला प्रतिसभा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून उत्तर दिले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी 100 टक्के फूटली आहे, असेच म्हणावे लागेल, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते व कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
दरम्यान, शनिवारी बारामती येथे जाहीर सभेत आपण सत्तेसाठी नाही तर केवळ विकासासाठी सत्तेत सहभागी झाल्याचे अजित पवार म्हणाले होते. यावेळी देशात मोदींसारखे दुसरे नेतृत्व आता तरी नाही. हे सत्य नाकारून चालणारच नाही. मोदींसारखा काम करणारा दुसरा नेता या देशात नाही.
त्यावर वडेट्टीवार म्हणाले, अजित पवारांना आत्ताच हा दृष्टांत का झाला? 10-20 वर्षांपूर्वी तो का झाला नाही, हा प्रश्न आहे. अजित पवार सत्तेसाठी नाही तर ईडीच्या भीतीनेच ते भाजपसोबत गेले आहेत. तसेच, अजित पवारांच्या मनात मुख्यमंत्रीपदाची सुप्त इच्छा आहे.
ती पूर्ण करण्यासाठी ते गेले असते तर समजू शकलो असतो. पण, ते काही मुख्यमंत्री झाले नाही. त्यांनी इकडून तिकडे आणि तिकडून इकडे उड्या मारल्या. पण, त्यांना उपमुख्यमंत्रीपदच मिळाले, असाही खोचक टोला त्यांनी लगावला.
मनसेचे आंदोलन योग्यच
मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे पडले आहेत. तसेच, या रस्त्याचे कामही अनेक दिवसांपासून रखडलेले आहे. याविरोधात मनसेकडून रविवारी कोकणात जागर यात्रा काढण्यात आली आहे. त्यावर वडेट्टीवार म्हणाले, मनसे करत असलेले आंदोलन योग्यच आहे.
यापूर्वीच हे आंदोलन व्हायला पाहिजे होते. या रस्त्यावरुन लोकांना जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. गणेश उत्सवात संपूर्ण चाकरमानी कोकणात जातात. समृद्धीपेक्षा हा रस्ता जास्त महत्त्वाचा होता. त्यामुळे राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्या आंदोलनाचा फायदा व्हावा आणि रस्त्याचे काम व्हावे, एवढीच अपेक्षा आहे.