कोलकाता – नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातभाचे चंद्र बोस यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे. नेताजींच्या दृष्टिकोनाचा प्रचार करण्याचे भाजपने दिलेले आस्वासन पाळले गेले नाही, असे कारण त्यांनी सांगितले आहे. चंद्र बोस यांनी 2016 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी भाजपच्या तिकीटावरून 2016 ची विधानसभा आणि 2019 ची लोकसभा अशी दोन वेळा निवडणूक लढवली होती.
भाजपमद्ये प्रवेश केला तेंव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सरत चंद्र बोस यांच्या सर्वसमावेशक विचारांचा प्रचार करण्याची परवानगी देण्यात आली होती. धर्म, जात आणि पंथ लक्षात न घेता सर्व समुदायांना भारतीय म्हणून एकत्र आणणे हा नेताजींचा प्राथमिक विचार होता. या विचारांचा प्रचार भाजपच्या मंचावरून करण्याचे मान्य केले गेले होते.
याशिवाय भाजपच्या चौकटीमध्ये आझाद हिंद मोर्चा स्थापन करण्याचेही मान्य केले गेले होते. मात्र प्रत्यक्ष्यात पश्चिम बंगाल किंवा केंद्रीय पातळीवरही तसे काहीच झाले नाही. या संदर्भात आपल्या प्रस्तावांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे चंद्र बोस यांनी बाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पाठवलेल्या राजीनाम्यामध्ये म्हटले आहे.
चंद्र बोस यांना 2016 मध्ये पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले होते. मात्र 2020 मध्ये संघटनात्मक फेरबदल झाले, तेंव्हा त्यांच्याकडील हे पद काढून घेण्यात आले होते. त्यांनी भाजपच्या प्रदेश नेत्यांच्या कार्यपद्धतीवर आणि “सीएए’वरही सातत्याने टीकाही केली होती. मात्र ते बऱ्याच काळापासून भाजपच्या संपर्कातच नव्हते असे भाजपच्या राज्य पातळीवरील प्रवक्त्यांनी म्हटले आहे.