नवी दिल्ली – भारताच्या शास्त्रज्ञांनी आपली महत्वाकांक्षी योजना चांद्रयान-3 च्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे रोवर उतरवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विदेश दौऱ्यावरून शनिवारी सकाळी परतत इस्रोच्या कमांड सेंटरमध्ये चांद्रयान-3 टीमच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अत्यंत्य महत्वपूर्ण अशा 3 घोषणा केल्या.
45 मिनिटांच्या भाषणात मोदी म्हणाले, “मी दक्षिण आफ्रिकेत होतो, त्यानंतर ग्रीसमध्ये कार्यक्रमाला गेलो होतो. पण माझे मन पूर्णपणे तुमच्यात गुंतले होते. मात्र कधी कधी असे वाटते की, मी तुमच्यावर अन्याय करतोय. माझी अधीरता आणि तुम्हाला त्रास. सकाळी-सकाळी आणि एवढा ऑड टाइम. मला तुमच्यासमोर नतमस्तक व्हायचे होते. पण मला तुम्हाला भारतात… (भावुक होत) लवकरात लवकर तुम्हाला भेटायचे होते.’
मोदी पुढे म्हणाले, “मला तुम्हाला नमन करायचे होते. तुमच्या मेहनतीला सलाम… तुमच्या संयमाला सलाम… तुमच्या जिद्दीला सलाम… तुमच्या चैतन्यला सलाम. तुमच्या आत्म्याला सलाम….चंद्राच्या ज्या भागावर टचडाउन झाले, तो बिंदू आता “शिवशक्ती’ म्हणून ओळखला जाईल,’ अशी घोषणाही मोदींनी यावेळी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी 7.30 वाजता बंगळुरू येथील इस्रोच्या कमांड सेंटरमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी चांद्रयान-3 मिशनमधील टीमच्या शास्त्रज्ञांची भेट घेताना सर्व शास्त्रज्ञांसोबत ग्रुप फोटोही काढला. इस्रो कमांड सेंटरमध्ये इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी मोदींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पंतप्रधानांनी सोमनाथ यांना मिठी मारली आणि पाठीवर थाप दिली.
मोदींनी केलेल्या घोषणा…
– पहिली- भारत दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन (नॅशनल स्पेस डे) साजरा करेल.
– दुसरी- ज्या ठिकाणी लॅंडर चंद्रावर उतरले, त्या जागेला “शिवशक्ती पॉइंट’ असे म्हटले जाईल.
– तिसरी- ज्या ठिकाणी चांद्रयान-2 च्या पायाचे ठसे आहेत, त्या ठिकाणाला “तिरंगा’ असे म्हटले जाईल.