नवी दिल्ली – महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने देखील थैमान घातले आहे. राज्यात या लाटेत देखील देशातील सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. करोना विषाणूचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला असला तरी राज्य सरकारने लावलेल्या कडक निर्बंधांमुळे येथील परिस्थिती नियंत्रणात येताना दिसतीये. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचं वृत्त आहे. सुत्रांकरवी मिळालेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये फोनवर संभाषण झालं असून त्यात राज्यातील कोरोना परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी कौतुक केले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी देखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली व विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करीत आहोत त्याविषयीही मुख्यमंत्री बोलले.
कोरोनाविरूद्धच्या लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान श्री. @narendramodi यांनी आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली. दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे असे ते म्हणाले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 8, 2021
पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. रेमडेसिवीर इंजेक्शन्स, ऑक्सिजन, लॉकडाऊन, 18 वर्षांवरील व्यक्तिंचं लसीकरण आणि राज्यातील वाढत्या मृत्यूंवर पंतप्रधानांनी माहिती घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिस्थिती पंतप्रधानांना अवगत करतानाच राज्यांच्या गरजाही पंतप्रधानांसमोर मांडल्याचं कळतं.
पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, महाराष्ट्राच्या काही सुचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
दरम्यान, करोना स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठका घेत असून प्रत्येक परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मणिपूर, त्रिपुरा आणि सिक्किमच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि परिस्थितीची माहिती घेतली होती.