नवी दिल्ली (प्रतिनिधी) – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह महाराष्ट्रातील चारही मंत्र्यांनी आज पदभार स्वीकारला. कार्यभार स्वीकारताच राणे यांनी अधिकाऱ्यांचा क्लास घेतला. मंत्र्यांच्या प्रश्नाची सरबत्ती बघून अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. यामुळे “राणेंचा क्लास अधिकारी नापास’ अशी चर्चा राजधानी दिल्लीत रंगली आहे.
नारायण राणे यांनी आज सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. याशिवाय डॉ. भारती पवार यांनी आरोग्य राज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्र्यांना हुरळून न जाता जनतेची कामे करण्यावर भर देण्याचा सल्ला दिला आहे. 15 आगस्टपर्यंत कुणीही दिल्लीबाहेर जावू नये, असा आदेश सुध्दा मोदी यांनी मंत्र्यांना दिला आहे.
नारायण राणे यांनी मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अधिकाऱ्यांना खात्याची माहिती विचारण्यास सुरवात केली. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगाचा जीडीपीमध्ये किती वाटा आहे? असा प्रश्न विचारला. मात्र, अधिकाऱ्यांना या प्रश्नाचे उत्तर देण्यात आले नाही.
यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. आत्मनिर्भर अभियान कसे सुरू आहे? याची माहितीसुध्दा अधिकाऱ्यांकडे नव्हती. यामुळे राणे चिडले आणि मंत्र्यांना न विचारता कोणताही अधिकारी रजेवर जाणार नाही, असे स्पष्ट सुनावले.
दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी सुध्दा आरोग्य रेल्वे राज्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी मंत्रालयातील अधिकारी वर्गाची भेट घेतली आणि मंत्रालयातील कामकाजाची माहिती जाणून घेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
सध्या करोना संक्रमनाचे संकट बघता त्यावरच्या उपाययोजना, लसीकरण मोहीम आणि संपूर्ण भारतभरात करोना संक्रमणाचा मुकाबला आणि आटोक्यात आणण्यासाठी जास्तीत जास्त उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ. भारती पवार यांचा मनोदय असून सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा अजून कशा मिळतील. तसेच त्या कशा अद्यावत करता येतील यासाठीच आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.