नवी दिल्ली – नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार काल पार पडला. यामध्ये अनेक मंत्र्याना डच्चू देण्यात आला. डॉ. हर्ष वर्धन यांना केंद्रीय आरोग्यमंत्रीपदावरून काढून टाकण्यात आले. दरम्यान,मनसुख मंडाविया यांच्याकडे केंद्रीय आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविली गेली आहे.
देशात करोना काळात डॉ. हर्ष वर्धन यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. लसीच्या तुटवड्यामुळे त्यांना लोकांच्या रोषाचा देखील सामना करावा लागला.
दरम्यान, आरोग्यमंत्री बदलल्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सवाल करत सरकारवर तिरकस निशाणा साधला आहे.
याचा अर्थ यापुढे लसीची कमतरता भासणार नाही का, असा खोचक सवाल त्यांनी केला आहे. तसेच सरकारने आरोग्य मंत्री बदलले याचा अर्थ करोनाचा लढा लढण्यास सरकारला आलेल्या अपयशाची कबुलीच दिली आहे अशी प्रतिक्रिया कालही कॉंग्रेस पक्षाकडून व्यक्त करण्यात आली होती.
सरकारच्या लसीकरणाच्या धोरणावर आणि त्यात नसलेल्या पारदर्शकतेवर कॉंग्रेसकडून सातत्याने बोट ठेवले जाते आहे. राज्यांना ज्या प्रमाणात लसींचे डोस हवे आहेत त्या प्रमाणात ते उपलब्ध होत नसल्याची सर्वच राज्यांची ओरड आहे. मात्र सरकारने असे का केले जाते आहे याचे थेट उत्तर देण्याचे आतापर्यंत टाळले आहे.