मुंबई : भारतीय जनता पक्षात जाऊन दबदबा निर्माण करण्यात माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांना यश आले आहे. गेल्याच आठवड्यात खासदार राणे यांची सुरक्षा महाविकास आघाडी सरकारकडून कमी करण्यात आली. मात्र काही दिवसांतच केंद्र सरकारने राणे यांना पुन्हा वाय दर्जाची सुरक्षा देऊ केली होती. आता खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोकण दौऱ्यावर येणार आहे. शाह यांचा हा दौरा राज्यातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी शुभ पायगुण ठरावा याची आस राणेंना लागली आहे.
सिंधुदुर्गातल्या लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करणार आहेत. त्याआधी भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर निशाणा साधला. अमित शाह यांच्या पायगुणाने राज्य सरकार जावं, अशी इच्छा नारायण राणेंनी बोलून दाखवली.
राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करताना मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारी करत असल्याचे संकेत दिले आहेत. पुढच्या निवडणुकीमध्ये मुंबईचा महापौर भाजपचा असेल, गुजराती समाज मोदी आणि शाह यांना सोडून बिनबुडाच्या लोकांकडे जाणार नाही. आम्ही फोडाफोडीत पीएचडी केली आहे. तसंच युतीबाबत मनसेनं ठरवावं, शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजप समर्थ आहे,’ अशी भूमिका नारायण राणेंनी मांडली. शिवसेनेशी युतीचा प्रश्नच येत नाही, अशी पक्षातली भूमिका असल्याचेही राणे यांनी सांगितले.
शिवसेना म्हणजे एक ना धड भाराभर चिंद्या
ज्या दिवशी ठाकरेंनी आघाडी सरकार स्थापन केलं, त्यादिवशीच त्यांनी हिंदुत्व सोडलं. त्यांनी हिंदुत्वासाठी काहीच काम केलं नाही. शिवसेनेला एकही विचार नाही. बाळासाहेबांनंतर एकही माणूस नाही, ज्याने बोललेलं पूर्ण केलं. एक ना धड भाराभर चिंद्या अशी अवस्था शिवसेनेची असल्याची घणाघाती टीका नारायण राणेंनी केली.