“”अबे श्यामा, तेरे मॉं को बोल, नानभाई आयेला है करके” श्यामने समोर पाहिलं आणि पिंपळावरच्या मुंजोबाच्या दर्शनाने जी भीती मनाभोवती पसरू शकेल, तेवढ्याच भीतीच्या प्रभावाखाली त्याने घरामध्ये धूम ठोकली. प्रसंग सामान्य नव्हताच मुळी. पिंजारलेले केस, ओढून ताणून विस्तारलेले डोळे, नेहमीपेक्षा अर्धा इंच फुगवलेली छाती, शर्टच्या बाह्या दंडापर्यंत वाळलेल्या, बॉटम आकाशाकडे दुमडलेले आणि चालण्या-बोलण्यात कमालीची मग्रुरी. ध्यान दुसरं-तिसरं कोणाचं नव्हतं, हे होते आपले नानबा उर्फ नानू आणि आदेश कोणाला देत होते तर, स्वत:च्या सख्ख्या चिरंजीवांना, श्यामला.
रोज ऑफिसमधून सावध, सामान्य अवस्थेत येणारे आपले श्यामळू वडील आज अचानक “भाई’ कसे झाले, ही श्यामच्या आकलनापलीकडची गोष्ट होती. आजचे वडिलांचे अवसान आणि अवतार श्यामला भेदरवणारा होता. यावर पर्याय एकच, घरात धूम ठोकणे, तो त्याने अवलंबला.
श्याम घरात गेला आणि पुढच्या क्षणाला नानी धावपळ करीत नानभाईंसमोर उगवल्या.
“”उधर क्या खडेली है तू, इधर आ”
नानूने अजूनही भूमिका बदलली नव्हती. आता आणखीन हे काय कलम काढलं याचा विचार नानी करीत नाही, तोच नानभाईंनी पलंगावर धाडकन बसकन् मारली आणि उजव्या ओठाच्या कोपऱ्यात, आगपेटीतील काडी चघळत तो घरातल्या चारी दिशांकडे मारक्या म्हशीसारखा पाहू लागला.
“”अबे श्याम्या, कुछ पाणीबिनी लाता है क्या नही, क्या देऊ एक रखके”
नानूचं अजब हिंदी ऐकून श्यामूऐवजी नानीच पाणी घ्यायला आत पळाल्या. थरथरत्या हाताने पाण्याचा ग्लास नानूच्या हातात ठेवून थेट भिंतीशी जाऊन उभ्या राहत नाही तोच नानूने तोंडावर पाण्याचा भलामोठा सपकारा मारला. तोंडात थेट गळ्यापर्यंत मावेल एवढं पाणी घेऊन बाराखडीच्या कुठल्याही मुळाक्षरांमध्ये बसायला मुश्कील ठरणारा असा आवाज काढीत खुशाल कोपऱ्यात लांबवर गुळणी टाकली आणि डोक्याखाली हात घेऊन तो पहूडला. काही वेळ तसाच गेला. नानी-श्याम-श्यामला तिघेही मात्र समोरच तोंडातले शब्द हरवल्यासारखे उभे होते. पाच-दहा मिनिटांनंतर नानूने खिशातून एक कागद काढला आणि तो ओठांपाशी नेऊन त्याचे चुंबन घेत “चूक’ असा आवाज काढला. उपस्थित प्रेक्षकांकडे जळजळीत नजर टाकीत कागदाची घडी सावकाश उलगडून नानूने मोठ्याने त्यावरील मजकूर वाचावयास सुरुवात केली.
“मी नानभाई, खालीपिली आपल्या नेत्याला अडकवला म्हणून पब्लिकला जबान देतो, आता आपण सिधा नाही रहाणार, भाईगिरी करणार! साल्ला एखादंदुसरा खून केला त काय लगी जेल दाखवायची! आपला गरम भेजा जादाच गरमलाय. आता पब्लिक सिधी नाही राहिली तर राडा हायच मग.
आमच्या नेत्याला पकडून टाकतात. काय सिध्धा हाये तो, व्हाइट कपडे, सोन्याच्या मुंद्या, गळ्यामधी चेन, व्हाइट चपला, दातामधेबी सोनं, अत्तर त काय लावतो भाई व्वा! आन त्याला पकडता काय रे काळतोंड्यांनो, आता हा नानभाईबी एकेकाचा गेम करणार’ नानूनी वाचलेला कागद नानी आणि समूहासाठी असावा अशी खात्री पटणारी वाक्यरचना नानूच्या तोंडातून भपकन् बाहेर पडली. अर्थात त्यावरून नानींच्या जे लक्षात यायचं ते आलं. नानूवर राजकारणाचा असणारा प्रचंड प्रभाव नानूला असे करायला लावत होता.
सध्या राजकारणात आलेली गुन्हेगारी नानूसाठी कमालीची आदर्श बनली होती आणि नानू, नानू न राहता नानभाई बनला होता. बराचवेळ डोळे मिटून नानभाई पडल्यामुळे कंटाळलेल्या नानी आणि दोन्ही मुलं घरातल्या उद्योगाला लागली. तब्बल दोन तासांनी नानू पलंगावरच उठून बसला. त्याने टी.व्ही. लावला. तोकड्या वस्त्रातील ललनांची चित्रगाणी लावणारी चॅनेल नानू आलटून पालटून लावत पलंगावरच बसल्या अवस्थेत नाचू लागला आणि बऱ्याच वेळापासून कीर्तनाला गेलेल्या नानूच्या मातोश्री घरात अवतीर्ण झाल्या. नानूचा तो नाच पाहून मातोश्री थेट घरात गेल्या. पाच दहा मिनिटांनी वर्तमानाची बित्तम्बातमी नानींकडून लक्षात घेऊन त्या बाहेर आल्या, त्यावेळी त्या नानूच्या “नानूबाई’ या नव्या अवताराच्या मातोश्री होत्या.
मातोश्रीच्या पहिल्याच वाक्याने नानूने आधी टी.व्ही. बंद केला आणि त्याच्या नकळत त्याचे झुलणे बंद झाले. “”काय रे नान्या, भाईगिरी करतो म्हणे. तुझा नेता काय जेलमध्ये गेला, म्हणून राडा करणार, आता मीच राडा करते आन् तुझ्या टाळक्यात काठी घालते. आजच्या कीर्तनात बुवांनी तुकोबांचा अभंग सांगितलाच आहे, सगळ्यांना उपदेश म्हणून, “तुका म्हणे ऐशा नरा, मोजून माराव्या पैजारा’ तोच आता अमलात आणते. तुझ्या नेत्याला चांगलं नाही करता येत काही, फक्त वाईट करतो तेवढं. ग्रामसफाई करावी, दारूबंदीचा प्रचार करावा, फावल्या वेळात लोकशिक्षण करावं, नीतीने वागावं, वाईट राजकारण्यांना “धडे’ शिकवावे, ते सोडून तो सगळे नको ते धंदे करतो आणि तू त्याच्या पावलावर पाऊल ठेवायला निघालाय, सुनबाई…”
मातोश्रींची आरोळी ऐकून नानी घरातून धावत आल्या आणि सासुबाईंकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागल्या.
“”काही नाही, तयारी कर आणि पोरांना घेऊन माहेरी जा, मी ही मोठ्याकडे जाते, याला करू दे याची भाईगिरी”
मातोश्रींचा शंभर नंबरी पवित्रा नानूसाठी “दे माय धरणी ठाय’ करून टाकणारा होता. नानूने कमालीच्या चपळाईने पलंग सोडला, भाईगिरी तर केव्हाच दूर उडून पडली, त्याचं त्यालाही कळलं नाही आणि त्याने मातोश्रींचे पाय पकडले ते थेट माफीनाम्यासाठी.
मग पुढे काय झालं असेल ते काय सांगायलाच पाहिजे का?
डॉ. विनोद गोरवाडकर