एक काळ असा होता की रेडिओ हेच मनोरंजनाचे साधन होते. “वंदेमातरम् ‘ने, मंगलप्रभातने सकाळी डोळे उघडत तर रात्रीच्या “आपली आवड’ च्या संगतीने, जय हिंद झाले की डोळे मिटायचे. रेडिओ म्हणजे एक खूप मोठी चैनीची वस्तू होती. रेडिओ जणू घरातील एक सदस्य किंवा व्यक्ती असायची. ती घरात आली की त्याच्यासाठी छान भरतकाम केलेले वस्त्र तयार व्ह्यायचं.
या रेडिओचा शोध 1885 साली इटालियन भौतिकशास्त्रज्ञ मार्कोनी याने लावला असे मानले जात असले तरी त्याआधीपासूनच जगातल्या विविध भागांत विविध बिनतारी प्रक्षेपणाचे प्रयोगही सुरू होते.
लहानपणी आपली आवड, विविध भारती, गीतमाला हे खूप आवडीचे, सर्वात लोकप्रिय प्रसारित कार्यक्रम होते तर आज विविध एफ.एम. स्टेशन्सद्वारे रेडिओने तितकीच लोकप्रियता मिळवून आजच्या मनोरंजनसाठी उपलब्ध असलेल्या विविध माध्यमांतही एक वेगळे स्थान रेडिओने प्रस्थापित केले आहे. बॅटरीवर चालणारा ट्रान्झिटरचा शोध लागल्यानंतर खांद्याला अडकवून मोठ्या ऐटीत चालणारा माणूस मी पाहिला आहे तर आज हाच रेडिओ प्रत्येकाच्या खिशात आहे. क्रिकेटचे धावते समालोचन ऐकण्यासाठी तर क्रिकेटप्रेमींचे घोळकेच्या घोळके दिवसभर रेडिओला चिकटलेले असायचे.
आजच्या दूरचित्रवाणीच्या काळातही दूरचित्रवाणीसंचाचा आवाज बंद करून संचाशेजारी रेडिओवर कमेंट्री लावून मॅच पाहायला आवडणारे क्रिकेट शौकीनपण पाहिले आहे. जी जान, जिवंतपणा रेडिओवरील कॉमेंट्रीत असते ती दूरचित्रवाणीवरील कोमेंट्रीत नाही असेच बहुतांश क्रिकेट शौकिनांचे म्हणणे असते. अगदी पूर्वीचे रेडिओवर आवडीचे स्टेशन लावताना होणारी खरखर त्याकाळातील लोक आवडीने सहन करत व त्यांच्यात तेवढी खरखर सहन करण्याची क्षमताही असायची. त्या काळातील विरंगुळ्यासाठी रेडिओ हे एकमेव सुंदर साधन होते. आजच्या पिढीला असे काही होते हेही माहीत नाही.
प्रथम इंडियन ब्रॉड कास्टींग कंपनीने मुंबई व कलकत्ता (आताचे कोलकाता) या केवळ दोन रेडिओ स्टेशन्सच्या माधयमातून प्रसारणाला सुरुवात केली होती. पण पुढे ही इंडियन ब्रॉड कास्टींग कंपनी दिवाळखोरीत गेली आणि यानंतर रेडिओ प्रसारण करण्याची जबाबदारी सरकारने आपल्या ताब्यात घेतली. 1936 साली त्याला “ऑल इंडिया रेडिओ’ हे नाव देण्यात आले. ऑल इंडिया रेडिओला “आकाशवाणी’ हे नाव म्हैसूरच्या एम. व्ही. गोपालस्वामी यांनी दिले. स्वातंत्र्यानंतर भारतात रेडिओची खूप मोठ्याप्रमाणात भरभराट झाली. त्यात विविध भारतीने रेडिओवरच्या मनोरंजनाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.
यूनेस्कोच्या महासंचालकांनी प्रस्ताव मांडून 13 फेब्रुवारी 1946मध्ये “युनायटेड नेशन्स रेडिओची’ स्थापना केली. तेव्हापासून 13 फेब्रुवारी हा दिवस जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
हा दिवस साजरा करायचा त्या काळाचा उद्देश म्हणजे जनतेमध्ये रेडिओसारख्या प्रभावी प्रसारमाध्यमाबद्दल जास्तीतजास्त जागरूकता निर्माण करणे आणि रेडिओमार्फत माहितीचा जास्तीतजास्त साठा उपलब्ध करून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे, तसेच ब्रॉडकास्टर्स नेटवर्किंग आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविणे.1982मध्ये रंगीत दूरचित्रवाणी आल्यानंतर काही वर्षे रेडिओ हे प्रसारमाध्यम थोडे मागे पडले परंतु बदलत्या कलानुरूप रेडिओसंचातही बदल होत गेले व पुढे एफबॅंडचे जाळे सर्वत्र पसरत गेले.
सध्या भारतातल्या 72 शहरांमध्ये खासगी एफएम वाहिन्या कार्यरत आहेत. आजही रेडिओ हे प्रसारमाध्यमातील प्रभावी माध्यम समजले जाते. अशा या रेडियोच्या शौकीन श्रोत्यांना रेडिओ जागतिक दिनाच्या शुभेच्छा.
ए. बाविस्कर